
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश- जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी, दि. ११ ):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारर्कीदीस २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने व त्यांच्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्म’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा अविरत प्रयत्न केला आहे. दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्य शासनामार्फत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या सेवा संकल्प अभियान अंतर्गत सेवा कार्याचा लाभ जिल्ह्यातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सेवा सेतू अभियान, इनोव्हेशन चॅलेंज, सेवा माझे योगदान, विकसित भारत संकल्प यात्रा, सेवा ज्योत यात्रा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, आशीर्वादाचा दिवा, बदलाची गोष्ट, आभार आणि संकल्पाची रांगोळी, नमो सेवा गाथा, जल जन आणि सेवा संकल्प यात्रा, जनसेवक महाकुंभ उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली आहे.
सेवा सेतू अभियान- तालुकास्तरावर सेतू अभियान अंतर्गत शिबीर आयोजन. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचे थेट लाभ पात्रतेनुसार नागरिकांना उपलब्ध करुन देणार. आपले सरकार सेवा केंद्रामार्फत अर्ज प्रक्रिया पूर्ण करुन कॅम्प मध्ये लाभ देणार. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर तालुक्यामध्ये किमान एका ठिकाणी आयोजन. तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय वनहक्क समिती बैठका आयोजन, नवीन वन हक्काचे दावे, मंजूर वनहक्क दाव्यानुसार अधिकार अभिलेख तयार करणे
सेवा सेतू अभियानातंर्गत शिबीर आयोजित करुन प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा/जिवंत सातबारा मोहिम, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप करणे, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते उपलब्ध करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, पात्र लाभार्थ्यांना वनहक्क दावे मंजूर करणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतंर्गत सिंचन विहिरींकरिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, आधारकार्ड देणे, जन्म मृत्यू नोंद घेणे प्रमाणपत्र देणे, शिकाऊ वाहनचालक परवाना, महिला बचत गट नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, महिला शेतकरी यांना प्रमाणपत्र वाटप करणे, सातबारा व आठ अ यांच्या नोंदी अद्यावत करणे, जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार जमिनीच्या मोजणीशी जोडणे आदी सेवा देण्यात येतील.
इनोव्हेशन चॅलेंज चे आयोजन: युवा, विद्यार्थी व स्टार्टअप्स, व्यावसायिक व कार्पोरेट इनोव्हेटर्स व ग्रामीण भागातील नवीन समाधाने विकसित करणाऱ्या लोकांना जोडण्यासाठी राज्यस्तरीय इनोव्हेशन चॅलेंज आयोजित केले जाईल; शैक्षणिक संस्था, स्टार्टअप नेटवर्क, इन्क्युबेशन सेंटर आणि खासगी कंपन्यांचा सहभाग. सर्वोत्कृष्ट इनोव्हेटर्सना डिजिटल प्लॅटफॉर्म दिला जाईल. (नोडल विभाग: कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग).
सेवा माझे योगदान: प्रत्येक गावात व वार्डात स्वच्छता मोहिमेचे (किनारे, घाट, बारव) आयोजन करून नियमित स्वच्छतेसाठी समिती स्थापन केली जाईल आणि संकल्प घेतला जाईल. सेवा योगदानासाठी रक्तदान शिबीर, अनाथालय वृध्दाश्रम भेट, वृक्षारोपण, स्वच्छता ही सेवा, आरोग्य तपासणी शिबीर, एक गाव दत्तक, योग आणि ध्यान सत्र, प्लास्टिक मुक्ती जागरुकता, महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता, वंचित मुलांसाठी शिक्षण सहकार्य, करिअर कौन्सिलिंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजीटल साक्षरता, अवयवदान संकल्प अभियान, व्यसनमुक्त भारत जागरुकता, पोषण आणि ॲनिमिया जागरुकता, रस्ते सुरक्षा जागरुकता, जलसंधारण, जलस्त्रोत स्वच्छता, कचरा वर्गीकरण आणि कम्पोस्टिंग, सायबर सुरक्षा जागरुकता, फिट इंडिया खेळ सत्र, वीर गाथा सैनिकांचा सन्मान, दिव्यांगजन सहयोग उपक्रम, मतदार जागरुकता आणि नोंदणी, व्होकल फॉर लोकल सहकार्य, सरकारी योजनांची जागरुकता, विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे या एका किंवा अनेक सेवांची स्थानिक गरजानुसार निवड (नोडल विभाग: गटविकास अधिकारी).
विकसित भारत संकल्प यात्रा: परिवर्तनकारी प्रकल्पांमुळे जीवनमान, सुरक्षा, अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा व संधी यामध्ये झालेल्या बदलांची प्रकल्पनिहाय माहिती संकलित करून माहिती व जनसंपर्क विभागामार्फत व्यापक प्रसिद्धी केली जाईल.
सेवा ज्योत यात्रा: गावोगावी सेवा ज्योत यात्रा व शहरात बाईक रॅली काढून विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाईल आणि ‘विकसित भारत २०४७’ चा संकल्प केला जाईल.
चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा: “मुलांच्या स्वप्नातील भारत” आणि “विकसित भारत २०४७” विषयांवर शाळांमध्ये चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून विजेत्यांचे जिल्हा व राज्य पातळीवर प्रदर्शन भरवले जाईल. निवडक स्पर्धकांचे व्हिडीओ तयार करावेत. (नोडल विभाग: गट शिक्षणाधिकारी, शालेय शिक्षण विभाग).
अंगणवाडी उत्सव: अंगणवाडी केंद्रांवर माता व बालकांसाठी आरोग्य-पोषण योजनांची माहिती, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि फळे-मिठाईचे वाटप, अंगणवाडी सेविका/मदतनीस/आशा कार्यकर्त्यांचा सन्मान केले जाईल. (नोडल विभाग: बालविकास प्रकल्प अधिकारी)
आशीर्वादाचा दिवा: शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी अधिकारी जावून दीप प्रज्वलित करतील.
बदलाची गोष्ट: योजनांमुळे झालेल्या सकारात्मक बदलांचे नागरिकांचे यशोगाथेचे व्हिडीओ/रिल्स संकलित करावेत यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता विभाग प्लॅटफॉर्म तयार करेल.
आभार आणि संकल्पाची रांगोळी- १७ सप्टेंबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी जनकल्याणकारी योजना, राष्ट्रीय प्रतिके आणि ‘विकसित भारत’ संकल्पनेवर नैसर्गिक सामुग्रीचा वापर करुन कला परंपरा, पर्यटन, निसर्ग यावर आधारित मानवी रांगोळीचे आयोजन. (नोडल विभाग: सांस्कृतिक कार्य विभाग).
नमो सेवागाथा- २ ऑक्टोबर २०२६ रोजी शाळा व ग्रामपंचायतींमध्ये कलापथकांद्वारे शासकीय योजनांची माहिती देणे व उत्कृष्ट कलापथक व नाट्यपथकांचा सन्मान. (नोडल विभाग: गट शिक्षणाधिकारी, शालेय शिक्षण विभाग).
जल, जन आणि सेवा संकल्प यात्रा: धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या यात्रेचे स्वागत, विकासकामांवर संवाद आणि एलईडी स्क्रीनद्वारे माहिती चित्रफित प्रदर्शन.
जनसेवक महाकुंभ– १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सरपंच ते संसद सदस्यांपर्यंतच्या लोकप्रतिनिधींचा सहभाग, विकसित भारत बाबत अनुभव कथन, पंतप्रधान उपस्थित लोकप्रतिनिधींना संबोधित करणार आहेत. ‘विकसित भारत’चा संकल्प आणि अभियानाची सांगता. (नोडल विभाग: ग्राम विकास विभाग).
याबाबत ९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.




