
गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणार्या चाकरमान्यांसाठी १६ आरोग्य पथके
गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणार्या लाखो चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील महामार्ग, मुख्य चौक आणि रेल्वे स्थानकांवर मिळून एकूण १६ तपासणी नाक्यांवर आरोग्य पथक तैनात करण्यात आली आहेत. ही पथके १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत अहोरात्र कार्यरत राहणार आहेत.
कोकणात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. या काळात मुंबई, ठाणे आणि इतर भागांतून लाखोंच्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी येतात सध्या पावसाचे दिवस असल्याने व वातावरणात वारंवार बदल होत असल्याने जिल्ह्यात सर्दी, ताप, डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. या साथीच्या पार्श्वभूमीवर परगावाहून येणार्या चाकरमान्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गरजेनुसार त्वरित प्राथमिक उपचार दिले जाणार आहेत.




