
पत्रकारांबाबत आक्षेपार्ह भाषा अयोग्य; संजय दिना पाटील यांनी माफी मागितल्याने विषय संपला : योगेश कदम
*खेड- पत्रकारांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरणे अयोग्य असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. संजय दिना पाटील यांनी याप्रकरणी माफी मागितली असल्याने हा विषय आता संपला आहे, असे राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी खेड येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विश्वास नांगरे पाटील यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीबाबत विचारले असता, “खाजगी कार्यक्रमाला जाणे गैर नाही. देशाच्या जडणघडणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोलाचे योगदान आहे,” असे कदम म्हणाले.
‘ऑपरेशन टायगर ०.३’ संदर्भातील प्रश्नावर त्यांनी, “आम्हाला कुणाकडे जाण्याची गरज नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम चांगले आहे. ऑपरेशन करण्याची गरज नाही, पेशंटच आमच्याकडे येतात,” अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली.
प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या चर्चेबाबत बोलताना, “तुकाराम मुंढे यांची तीन वर्षे बदली होऊ नये, अशी आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. शक्य असल्यास त्यांना मुदतवाढ द्यावी,” असे त्यांनी स्पष्ट केले.
समान नागरी कायद्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर, “यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल,” असे योगेश कदम यांनी सांगितले.
..




