
योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची कधीच वेळ येत नाही-मंत्री उदय सामंत यांचा स्टेटस चर्चेत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष फुटीनंतर आता पक्ष सोडून गेलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा हाती घेतली आहे. नुकताच त्यांनी संजय देशमुख यांच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी जाण्यासाठी ते मुंबईहून विमानाने नागपूरला निघाले होते. मात्र या प्रवासादरम्यान आपल्या गावी जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावेळी दोघांनीही एकाच विमानातून प्रवास केला.तर या प्रवासादरम्यान फडणवीस आणि ठाकरे यांनी हस्तांदोलन करून एकमेकांची विचारपूस केली. यावेळी आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, आणि अनिल देसाई हे देखील उपस्थित होते. दरम्यान आता फडणवीस आणि ठाकरे यांच्या एकत्रित विमान प्रवासाची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
सामंत यांनी ठेवलेल्या सूचक स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून तर्क-वितर्कांनाही उधाण आले आहे. सामंत यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा हातात हात असलेला फोटो स्टेट्सला ठेवला आहे. तर या स्टेट्समध्ये योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची कधीच वेळ येत नाही, असा मजकूर लिहलेला आहे. तसेच याच स्टेट्समध्ये धनुष्यबाण आणि कमळ चिन्ह देखील आहे. यामुळे सामंत यांच्या स्टेट्सला वेगळं महत्व आल आहे.
दरम्यान ठाकरे-फडणवीस या दोन्ही नेत्यांच्या एकत्र विमान प्रवासामुळे आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असतानाच ठाकरेंचे सूचक वक्तव्यही समोर आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी, विमानामध्ये आमची उच्च दर्जाची आणि उच्चस्तरीय चर्चा झाली असून, काय ठरले ते येत्या काही दिवसांत कळेल, असे म्हटलं आहे.यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत उत्सुकता जनतेत निर्माण झाली असतानाच एकनाथ शिंदेंचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. शिंदेंनी या भेटीवर, विमाना पेक्षा इमान महत्वाचा असतो अशी दोनच शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. तर 2019 मध्ये राज्यातील जनतेनं आधीच एकाच विमानाने जाण्याचे तिकिट दिले होते. पण तुम्ही बैमानी केली. त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून प्रवास केला. आता तर गटांगळ्या खात सुटलेत. यामुळेच आता त्यांच्याकडून असे प्रकार सुरू आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस खूप हुशार असून कपट काय असतो हे अनुभवलं आहे, असा टोला लगावा आहे.




