
‘एक घर – एक तुळस’ संकल्पातून आषाढी एकादशीला तुळशीच्या रोपांचे वाटप
रत्नागिरी, दि. २५ जुलै : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री विठ्ठल मंदिर येथे नगरसेविका सौ. मेधा कुळकर्णी, सौ. प्रिया साळवी आणि सौ. संगीता भोवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘एक घर – एक तुळस’ या संकल्पनेवर आधारित तुळशीच्या रोपांचे वाटप या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी भाविकांना तुळशीच्या ३५० रोपांचे वाटप करण्यात आले. धार्मिक श्रद्धा, पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृतीचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे भाविकांनी मनापासून स्वागत करत सर्वत्र कौतुक केले.
आषाढी एकादशी निमित्त मारुती मंदिर येथून श्री विठ्ठल मंदिरापर्यंत पारंपरिक दिंडी व वारीचे आयोजन करण्यात आले होते. मारुती मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ वारीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना “हरित रत्नागिरी” घडविण्यासाठी अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. नगरसेविका सौ. मेधा कुळकर्णी यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर श्री विठ्ठल मंदिर परिसरात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भाविकांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. राहुल पंडित, नगराध्यक्षा सौ शिल्पाताई सुर्वे,भारतीय जनता पक्षाचे नगरपालिकेचे गटनेते तथा नगरसेवक श्री. राजेश तोडणकर, नगरसेवक राजू कीर,नगरसेविका सौ. प्रिती सुर्वे, जिल्हा खरेदी-विक्री संघाच्या संचालिका सौ. ऋतुजा कुळकर्णी, विभागप्रमुख श्री. मनोज साळवी तसेच उपविभाग प्रमुख श्री. नरेंद्र देसाई ,सौ संगीता सुर्वे ,सौ.वेदीका पावसकर,यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी नगरसेविका सौ. मेधा कुळकर्णी म्हणाल्या, “आषाढी एकादशी हा केवळ भक्तीचा उत्सव नसून समाजाला संस्कार, पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश देण्याचीही सुवर्णसंधी आहे. तुळस ही आपल्या संस्कृतीतील पावित्र्य, श्रद्धा आणि निरोगी जीवनाचे प्रतीक आहे. प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावले गेले तर पर्यावरण संवर्धनाबरोबरच भारतीय संस्कृतीचे जतनही होईल. ‘एक घर – एक तुळस’ हा संकल्प प्रत्येक कुटुंबाने स्वीकारावा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.”
या उपक्रमासाठी आवश्यक तुळशीची रोपे समर्थ एक्झॉटिका, मारुती मंदिर येथील सौ. कोमल तावडे यांनी ‘ना नफा – ना तोटा’ तत्त्वावर उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या या सहकार्याबद्दल आयोजकांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. प्रिया साळवी (उपशहर प्रमुख), सौ. सीमा कदम (विभागप्रमुख), सौ. संगीता भोवड ,सौ. वेदिका पावसकर यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. धार्मिक परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देणाऱ्या या अभिनव उपक्रमामुळे आषाढी एकादशीचा उत्सव अधिक अर्थपूर्ण झाल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

छायाचित्र परिचय : आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिर येथे नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, नगरसेविका सौ. मेधा कुळकर्णी, भारतीय जनता पक्षाचे गटनेते तथानगरसेवक श्री. राजेश तोडणकर, नगरसेवक राजू कीर,नगरसेविका सौ. प्रिती सुर्वे, जिल्हा खरेदी-विक्री संघाच्या संचालिका सौ. ऋतुजा कुळकर्णी तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत भाविकांना तुळशीच्या ३५० रोपांचे वाटप करण्यात आले.




