
मिर्या-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात ४ किमीचा बोगदा, रस्ते विकासाला ४०० कोटींची गती
रत्नागिरी जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि गतिमान करण्यासाठी मिर्या-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात सुमारे चार किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव केंद्र सरकारसमोर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावासह रस्ते विकासाच्या विविध कामांसाठी सुमारे ४०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री ना. उदय सामंत आणि चिपळूणचे आ. शेखर निकम यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. या मागण्यांवर केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती देण्यात आली.
नागपूर येथे झालेल्या बैठकीत मुंबई-गोवा महामार्गाच्या सुरू असलेल्या ६, १९० कोटी रुपयांच्या प्रकल्पाव्यतिरिक्त जिल्ह्यातील विविध विकासकामांवर चर्चा झाली. त्यामध्ये आंबा घाटातील चार किलोमीटरचा बोगदा हा सर्वाधिक महत्त्वाचा प्रस्ताव असून, तो साकार झाल्यास घाटातील वळणावळणाचा आणि धोकादायक प्रवास अधिक जलद व सुरक्षित होणार आहे. याशिवाय संगमेश्वर, वाकेड, तळेकांटे, तुरळ आणि वांद्री येथे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पादचारी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव असून संपूर्ण महामार्गावर सुमारे ८० आधुनिक बसथांबे उभारण्याचीही योजना आहे.




