
महायुतीतील बंडखोरी टळली ,जुईली दळवींचा उमेदवारी अर्ज मागे
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या जुईली महेंद्र दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज आज (३ जून) मागे घेतला आहे. अर्ज मागे घेण्यासाठी शिवसेना नेते विकास गोगावले रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते.
अलिबागचे शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वीच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
याबाबत बोलताना विकास गोगावले यांनी सांगितले की, पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचे पालन करणे हे कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज आम्ही मागे घेतला असून, अर्ज दाखल करताना ज्या सूचकांनी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता, ते सर्वजण एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या निर्णयामुळे कोकण विधान परिषद निवडणुकीतील संभाव्य बंडखोरीची शक्यता मावळली असून, शिंदे गटात एकजूट कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.


