
कोकणात माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्यांना मोठा दिलासा, वानर, माकड पकडल्यास मिळणार ६०० रुपये
कोकणात माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. माकडे व वानरांमुळे वाढत चाललेल्या संघर्षाचा गंभीर विचार करून महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २५ नोव्हेंबर रोजी नवीन कार्यपद्धती जाहीर केली आहे. त्यानुसार १० माकडे पकडल्यास प्रति माकड ६०० तर त्याहून जास्त माकडांसाठी प्रति माकड ३०० रुपये मिळणार आहेत. १ ते ५ माकडांच्या प्रकरणात अतिरिक्त १००० रुपयांचा प्रवास भत्ता देण्यात येणार आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, तसेच कोकणातील इतर भागांत गेल्या काही वर्षांपासून माकडांचा रोजच्या आयुष्यात वाढता हस्तक्षेप दिसून येत आहे. शेतातील फळे, भाजीपाला, घरातील धान्य, वस्तूंचे नुकसान एवढेच नव्हे तर हल्ल्यांत माणसे जखमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गाव पातळीवर तक्रारी वाढत असताना यावर एकसंध धोरण नसल्याने लोक त्रस्त होते.
वनपरिक्षेत्र गाव, शहर व नगरपालिकांकडून तक्रारीशी संबंधित अधिकारी घटनास्थळाची पाहणी करतील व उपद्रवी माकडांची संख्या, नुकसानीचे स्वरुप, तपशील नोंदवला जाईल. सहाय्यक व वनसंरक्षकाच्या आदेशानंतर प्रशिक्षित पथकाला जबाबदारी दिली जाणार आहे.www.konkantoday.com




