
मंडणगड बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार: गृह राज्यमंत्री योगेश कदम ५ कोटींच्या निधीतून उभारणार अद्ययावत इमारत; तात्पुरत्या प्रवासी शेडचे लोकार्पण
रत्नागिरी, दि. १० ): मंडणगड तालुक्यातील नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या सेवेसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात सर्व सोयीसुविधांनी सज्ज अशी नवीन बसस्थानक इमारत उभारण्यात येत असून, त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या नवीन इमारतीचे भूमिपूजन आणि तात्पुरत्या प्रवासी शेडचे लोकार्पण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते आज पार पडले. या कामामुळे तालुक्यातील नागरिकांची प्रदीर्घ काळाची गैरसोय कायमस्वरूपी दूर होईल, असा विश्वास श्री कदम यांनी व्यक्त केला.
भूमिपूजनानंतर आयोजित समारंभात बोलताना राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, “समस्यांवर केवळ तात्पुरत्या मलमपट्टीपेक्षा कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन उपाय शोधण्यावर माझा भर असतो. मंडणगड बसस्थानकाची जुनी इमारत पाडून नवीन अत्याधुनिक इमारत उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. नवीन इमारतीमुळे स्वच्छतागृहांचा प्रश्न मिटेल, संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण होईल आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळतील.
महिलांसाठी मॉल व ई-बस चार्जिंग स्टेशन
परिसरातील महिला बचत गटांना हक्काचा रोजगार मिळावा यासाठी बसस्थानक परिसरात स्वतंत्र मॉल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. तसेच केवळ इमारतीचे बांधकाम न करता जुन्या नादुरुस्त बसेस बदलून आगाराच्या मागणीनुसार नव्या बसेस दिल्या जातील, अशी ग्वाही दिली. भविष्यातील इलेक्ट्रिक बसेससाठी तातडीने चार्जिंग स्टेशनची जागा निश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
२४ तास पाणी पुरवठ्यासाठी कटिबद्ध
मंडणगड नगरपंचायतीच्या पाणी प्रश्नावर बोलताना, नगरपंचायत पाणी योजनेचा निधी मंजूर झाला असून तांत्रिक अडचणी दूर करून काम जलदगतीने सुरू केले जाईल, तसेच शहरातील प्रत्येक घरात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे श्री. कदम यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता केंद्रे, मंडणगड पंचायत समितीच्या सभापती प्रणाली चिले, नगराध्यक्ष सोनल बेर्डे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, उपसभापती दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, दीप्ती घडशी, शशिकांत चव्हाण, तहसीलदार अक्षय ढाकणे, आगारप्रमुख मदनीपाशा जुनेदी, माजी सभापती अनंत लाखण, रामदास रेवाळे, विनोद जाधव, दीपक घोसाळकर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




