
गरीबांवरच का? नेत्यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी?
रत्नागिरी नगरपालिकेच्या कारवाईवर ठाकरे युवासेनेच्या प्रसाद सावंत यांचा सवाल
रत्नागिरी : शहरातील गरीब फुटपाथ विक्रेत्यांवर नगर परिषदेने केलेल्या कारवाईवर ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. गरीबांचा उदरनिर्वाह हिरावून घेणारी ही कारवाई एकतर्फी असून, नेते आणि त्यांच्या चेलेचपाट्यांच्या अनधिकृत बांधकामांवर नगर परिषद कधी कारवाई करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नगरपालिकेने फुटपाथ विक्रेत्यांना कर्ज वाटप केले आहे आता ते कर्ज नगर परिषद स्वतः फेडणार का? कर्ज देताना कुठचा नियम लावला असा प्रश्नही त्यांनी उपस्थीत केलाय.
याबाबत बोलताना प्रसाद सावंत म्हणाले की, “रत्नागिरी नगरपालिकेला फक्त गरीब फुटपाथ विक्रेतेच दिसतात का? सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करून दोन वेळचं पोट भरणाऱ्या हातगाडीवाल्यांवर, भाजी विक्रेत्यांवर बुलडोझर फिरवला जातो. पण याच शहरात नेत्यांच्या आशीर्वादाने उभी राहिलेली अनधिकृत दुकाने, हॉटेल्स, आणि गाळ्यांवर कारवाई करण्याची हिम्मत नगर परिषदेत नाही. हा दुटप्पीपणा आहे.”
कारवाईला विरोध नाही पण सरसकट सर्वांवर व्हावी. जर फुटपाथ मोकळे करायचेच असतील, तर सर्वात आधी नेते, माजी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी फुटपाथवर, नाल्यांवर केलेली अतिक्रमणे हटवा. कारवाईला विरोध नाही. मात्र कारवाई करताना नियम सर्वाना सारखेच असावेत त्यात गरीब-श्रीमंत, हा माझा हा नेत्याचा असा भेदभाव असू नये. गरीबांना पर्यायी जागा द्या. कारवाई करण्याआधी या विक्रेत्यांना हॉकर्स झोन किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून द्या. थेट पोटावर पाय देणे चुकीचे आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांची यादी नगरपालिकेने जाहीर करावी आणि त्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल जनतेसमोर ठेवावा, अशा ठोस मागण्या प्रसाद सावंत यांनी केल्या आहेत.
या प्रकरणी लवकरच युवासेना आक्रमक भूमिका घेणार असून, जर गरीबांवरची कारवाई थांबवून बड्या धेंड्यांवरसुद्धा कारवाई झाली नाही, तर नगरपालिकेसमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही सावंत यांनी दिला आहे.




