सर्वसामान्य जनतेचे प्रश्न स्थानिक स्तरावरच सुटायला हवेत -जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी, दि. 6 सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्यास्तरावरच सुटायला हवेत. त्यांचे प्रश्न जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये यायला नकोत, अशा पध्दतीने प्रशासनाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हास्तरीय लोकशाही दिन झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सागर पाटील यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
नवीन अर्ज तसेच प्रलंबित अर्जांचा जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी यावेळी सविस्तर आढावा घेतला. 15 दिवसात प्रलंबित अर्जांची निर्गती झाली पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, रस्ता, मोजणी, नुकसानीचा मोबदला, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम असे विषय स्थानिक स्तरावरच ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, तहसिलदार जास्तीत जास्त उपविभागीय अधिकारी स्तरावर सुटायला हवेत. सर्व सामान्य नागरिक आपल्या समस्या घेऊन जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये येत असतात, हे योग्य नाही. या लोकांचे प्रश्न जागेवरच संबंधित यंत्रणेने मार्गी लावून न्याय द्यायला हवा. सामान्य नागरिकांवर आपल्या डोळ्यांसमोर अन्याय होत असेल, तर हे बरोबर नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रलंबित विषय 15 दिवसात निकालात काढावेत, असेही ते म्हणाले.
क्षेत्रीयस्तरावरील उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button