
कशेडी घाटात दरड हटविण्याचे काम सुरू; खवटीतील घराला धोका, तिघांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
कशेडी घाटातील राष्ट्रीय महामार्गावर दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असताना खेड तालुक्यातील खवटी येथील कृष्णा बाबू जाधव यांच्या घराजवळ दरड येऊन घराला धोका निर्माण झाला आहे.
संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने खबरदारीची उपाययोजना केली. कृष्णा बाबू जाधव यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून त्यांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
दरड हटविण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू असून परिसरावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच आवश्यक नसल्यास धोकादायक भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




