
हिंजवडीतील आयटी कंपनी बंद; 700 अभियंते अडचणीत
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीने अचानक कार्यालय बंद केल्याने सुमारे 700 अभियंत्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. कंपनीने गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात भरती केली होती; मात्र फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांचे वेतन रखडू लागले.
व्यवस्थापनाने अंतर्गत लेखापरीक्षणाचे कारण देत वेतन लवकर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कंपनीने रातोरात कार्यालय बंद केले. काही कर्मचाऱ्यांना दिलेले वेतनाचे धनादेशही बाऊन्स झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी कर्मचाऱ्यांनी ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’च्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे. तसेच कामगार मंत्रालयाकडेही तक्रार करण्यात आली असून कर्मचाऱ्यांकडून सुरक्षा ठेव म्हणून घेतलेले १५ हजार रुपये परत करण्याची आणि कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.




