
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा काळोखाच्या साम्राज्यात, हायमॅक्स पडला बंद
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठ्यावर बसविण्यात आलेले नवे दोन्ही हायमास्ट दिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. परिणामी रात्रीच्या वेळी या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरते. याचा मोठा फटका, वाहनचालक, एसटी प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांना बसत आहे. तसेच येथे काही अनुचित प्रकारही घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हातखंबा तिठा अत्यंत महत्वाचा असून तीन प्रमुख रस्ते येथे एकमेकांना जोडतात. महामार्गाचे काम या भागात पूर्ण झाले असले तरीही हायमास्ट सुरू करण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. सुरुवातीला काही दिवस हे दिवे कार्यान्वित ठेवण्यात आले होते. मात्र त्यानंतर ते अचानक बंद पडले आहेत हातखंबा परिसरात मागील काही दिवसात तब्बल तीन चोरीच्या घटना घडल्या असून चोरटे अजूनही फरार आहेत. अशा परिस्थितीत चौकातील हायमास्ट बंद असल्याने रात्रीच्या वेळी गुन्हेगारी घटना होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर हे दिवे कार्यान्वित करावे, अशी मागणी स्थानिकांकडून होऊ लागली आहे.www.konkantoday.com




