‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय लष्कर अलर्ट, सीमावर्ती भागात अतिरिक्त सैन्य तैनात; राखीव दलांचीही जमवाजमव!

:* पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केली. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानची आगळीक सुरु असून भारताच्या दिशेने पाकिस्तान ड्रोन हल्ले करत आहे. पाकिस्तानच्या या हल्यांना भारत देखील जोरदार प्रत्युत्तर देत आहे.दोन्ही देशात तणावाची परिस्थिती वाढल्यामुळे भारतीय सैन्य अलर्ट झालं आहे.

आता देशाच्या सीमावर्ती भागात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच राखीव दलांचीही भारतीय सैन्यांकडून जमवाजमव सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. भारतीय लष्कराने सीमावर्ती भागात पूर्ण ताकद उपलब्ध करण्याचा विचार केल्याची माहिती या वृत्तामधून समोर आली आहे.दरम्यान, शुक्रवारी एका अधिसूचनेत संरक्षण मंत्रालयाने फेब्रुवारी २०२८ पर्यंत देशभरात तैनातीसाठी प्रादेशिक सैन्याच्या (टीए) ३२ पैकी १४ पायदळ बटालियन सक्रिय करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे पाऊल सैन्याच्या अतिरिक्त बळकटीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं ठरणार असल्याचं बोललं जात आहे. कारण जेव्हा तणावाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा टीए कर्मचारी देखील विविध कर्तव्ये पार पाडण्यासाठी नियमित दलांसाठी मदत करतात.

तसेच आवश्यक सेवा आणि अंतर्गत सुरक्षा कर्तव्ये देखील ते पार पाडतात. एका नियमित टीए बटालियनमध्ये सुमारे ७५० कर्मचारी असतात. त्यात अर्धवेळ स्वयंसेवक असतात आणि गरजांनुसार नियमित सैन्याला मदत करतात. सूत्रांच्या माहितीवरून द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, गेल्या काही आठवड्यांपासून प्रमुख सीमावर्ती भागात सैन्याची अतिरिक्त भरती करण्यात येणार असून विविध ठिकाणी अधिक बटालियन पाठवण्यात येणार आहेत. या जवानांसाठी अतिरिक्त वाहतूक व्यवस्था केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button