शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो तरी चालेल, पण मागे हटणार नाही : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री झालो, यावर विश्वास बसत नाही. या घटनेची ३३ देशांनी नोंद घेतल्याचे देवेंद्र फडणवीस सांगितले. स्वतःचे मंत्रिपद दाव्याला लावून ९ मंत्री, ४० आमदार, १० अपक्ष आमदार बाहेर सत्तेतून बाहेर पडले. समोर मोठमोठे नेते होते, तर दुसरीकडे शिवसैनिकावर विश्वास होता, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, स्वत:चं मंत्रीपद डावावर लावून मी ५० आमदारांना घेऊन, समोर बसलेल्या बलाढ्य सरकारविरोधात बंड पुकारले. समोर सत्ता, यंत्रणा, एवढी मोठी माणसं होती. दुसरीकडे बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक. मला अभिमान आहे या ५० लोकांचा. आपण हे मिशन सुरु केलं तेव्हा कोणी विचारलं नाही. कुठे चाललोय, कधी येणार, किती वेळ लागणार कोणी विचारलं नाही.
मी मतदानाच्या दिवशी निघून आलो तेव्हा डिस्टर्ब होतो. मला बाळासाहेबांची शिकवण आठवली. बाळासाहेब म्हणायचे अन्यायाविरोधात बंड पुकारलं पाहिजे. आम्हाला अनेक फोन आले. पण मला एकही आमदार आपण मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊयात असं म्हणाला नाही. हा या आमदारांचा मोठेपणा आहे. सुनिल प्रभु यांना माहिती आहे माझं कशाप्रकारे खच्चीकरण झालं. शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो, तरी चालेल. पण मागे हटणार नाही, अशी भावना शिंदेंनी व्यक्त केली.
ही छोटी मोठी घटना नाही. जे ग्रामपंचायत सदस्य, नगरपंचायत सदस्यही इकडे तिकडे हलू देत नाही. पण हे एवढं मोठं का झालं, काय घडलं, कशासाठी झालं? २०-२५ वर्ष एकनाथ शिंदेने रक्ताचं पाणी केलंय. मी १७ वर्षांचा होतो. बाळासाहेबांच्या विचाराने मी वेडा झालो आणि शिवसैनिक झालो. एका प्रकरणामध्ये मी आनंद दिघेंच्या संपर्कात आलो. वयाच्या १८ व्या वर्षी शाखाप्रमुख झालो. अनेकजण सिनियर होते. त्यांना बोललो की यांना करा, तर माझ्या खांद्यावर हात टाकून बोलले, “मला शिकवतो का?”, अशी आठवण यावेळी शिंदे यांनी सांगितली.

एका बाजुला महान नेते होते, सरकार होते, यंत्रणा होती आणि दुसरीकडे माझ्यासारखा एक साधा शिवसैनिक होता. पण माझ्या भरोशावर चाळीस आमदारांनी सगळं पणाला लावलं. या सगळ्यांचा मला अभिमान आहे. मी या सगळ्यांना सांगितलंय की पुढं काय व्हायचं ते होवो, तुमचं नुकसान होतंय असं वाटलं तर मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही. तर मी जगाचा निरोप घेऊन निघून जाईन, असेही त्यांनी सांगितले.

सुरुवातीला मला मुख्यमंत्री करण्याचं ठरलं होतं. नंतर कुणीतरी सांगितलं मी नको, उद्धव ठाकरेंना करा. मी काहीही बोललो नाही. मला सत्तेची हाव नाही. मात्र, नंतर निवडून आलेल्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. अनेक आमदार यायचे आणि म्हणायचे आपली नैसर्गिक युती भाजपासोबत आहे. यानंतर मी ५ वेळा उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. याला दीपक केसरकर साक्षीदार आहेत. मात्र, याचा परिणाम झाला नाही. अजित पवार यांनी माझ्या खात्याच्या बैठका घेतल्या तरी मी त्यांना काही बोललो नाही. त्यांनी ८०० कोटी रुपये घेतले तरी मी काही बोललो नाही. मात्र, तुम्ही समांतर नगरविकास खात्याचा प्रमुख का केला?, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button