
प्रशासनाने बंदी उठवल्यानंतर गणपतीपुळे किनारा पुन्हा पर्यटकांनी गजबजला
पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला गणपतीपुळे समुद्रकिनारा पावसाळ्यात समुद्राला असणारे उधाण आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा संभाव्य धोका लक्षात घेता २६ जूनपासून समुद्रकिनार्यावर जाण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली होती. मात्र आता पावसाचा जोर ओसरल्याने आणि समुद्रातील उधाण ओसरल्याने तब्बल दोन महिन्यांच्या बंदीनंतर हा किनारा पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्याने आणि समुद्रातील स्थिती सामान्य झाल्याने किनारा खुला करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटन
व्यावसायिकांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर २४ ऑगस्ट रोजी गणपतीपुळे ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून सोमवारी दुपारपासूनच किनारा पर्यटकांसाठी खुला करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.



