
महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य: आ. प्रमोद जठार
रत्नागिरी:-
सध्या केंद्रात, राज्यात आणि स्थानिक पातळीवर महायुतीचे सरकार कार्यरत असल्यामुळे जनतेच्या प्रलंबित समस्यांना थेट आणि तातडीने सोल्यूशन मिळवून देणे हा आमच्या अभियानाचा मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी केले. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या विशेष जनसंवाद अभियानाबद्दल सविस्तर माहिती दिली.
या अभियानाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन जनता, कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधला जात असून, त्याद्वारे संघटनेला अधिक ताकद दिली जात आहे, असे त्यांनी नमूद केले.
संतोष साखरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या संपूर्ण महाराष्ट्रात या अभियानांतर्गत विविध जिल्ह्यांचे दौरे सुरू आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून रत्नागिरी, दापोली (उत्तर रत्नागिरी), रायगड, उत्तर रायगड आणि सावंतवाडीसह विविध भागांतील नागरिकांकडून व कार्यकर्त्यांकडून समस्यांसंबंधीची निवेदने स्वीकारली जात आहेत.
ही प्राप्त झालेली निवेदने संबंधित मंत्री आणि खात्यांपर्यंत पोहोचवून त्यांचे तात्काळ निराकरण करणे, योग्य तो पाठपुरावा करणे आणि नागरिकांना न्याय मिळवून देणे हे काम याद्वारे केले जात आहे.
दर दोन-तीन महिन्यांच्या अंतराने अशा प्रकारच्या दौऱ्यांचे आयोजन करून लोकांच्या अडचणी सोडवण्यावर विशेष भर दिला जात असल्याचे आमदार जठार यांनी स्पष्ट केले.
केंद्रातील मोदी सरकारच्या काळात जसे अनेक वर्षांचे प्रश्न मार्गी लागले, त्याच धर्तीवर या सेवा अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांचे प्रश्न यशस्वीपणे सोडवले जात असल्याचा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.




