
अखेर सरकार झुकलं, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा,
काही दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. मागील जवळपास महिनाभरापासून हे विद्यार्थी जंतर मंतरवर आंदोलन करत होते.नीट पेपर लीक प्रकरणी शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती. मात्र सरकारकडून याची दखल घेतली जात नव्हती. आता अखेर जवळपास महिनाभराने केंद्र सरकार विद्यार्थ्यांसमोर झुकलं आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नीट पेपर फुटी प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी स्विकारली आहे. दोन पानांच्या पत्रात त्यांनी आपली भूमिका मांडत पदावरून दूर होत असल्याचं सांगितलं आहे. प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आलेलं सर्वात मोठं यश मानलं जात आहे.धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा पत्रात नक्की काय म्हटलं?
माझ्या तरुण सहकाऱ्यांनो, मी गेल्या चार दशकांहून अधिक काळ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारांसाठी स्वतःला समर्पित केले आहे. एक सशक्त, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्थाच एका मजबूत राष्ट्राचा पाया असते, यावर माझा नेहमीच ठाम विश्वास राहिला आहे.
मी देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या न्याय्य अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारतातील युवा पिढीची स्वप्ने साकार करणे, हा आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा नैतिक संकल्प आहे. आदरणीय पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची जी संधी मला मिळाली, त्याबद्दल मी पंतप्रधानांचे मनःपूर्वक आभार मानतो.
मात्र, ३ मे २०२६ रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेत काही गैरप्रकार समोर आले. भारत सरकारने याची त्वरित दखल घेत ही तपासणी ‘सीबीआय’कडे सोपवली, परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षेची नवी तारीख जाहीर केली. यासोबतच, पुढील वर्षापासून ही परीक्षा ‘सीबीटी’ (संगणकावर आधारित) पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या काळात २० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा अतिशय सुरळीत पार पडावी, हीच आमची मुख्य प्राथमिकता होती. यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारे आणि विशेषतः जिल्हा प्रशासनासोबत पूर्ण समन्वयाने काम केले. विद्यार्थी, पालक आणि माता-पित्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे २१ जून २०२६ रोजी ही परीक्षा यशस्वीपणे संपन्न झाली.पहिल्याच दिवसापासून मी याची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि या परिस्थितीपासून कधीही काढता पाय घेतला नाही. कोणत्याही हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्याचे भविष्य परीक्षा माफियांच्या हाती खराब होऊ देणार नाही आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, हाच माझा दृढ संकल्प होता.
१६ जुलै रोजी जाहीर झालेला नीट-युजीचा निकाल अतिशय समाधानकारक राहिला, ज्यामध्ये गरीब आणि सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना यश मिळाले. पण दुर्दैवाने, या काळातही काही जबाबदार पदांवर बसलेल्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्याचा आणि अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे माझे मन अत्यंत व्यथित झाले.
मी नेहमीच आपल्या लोकशाहीच्या ताकदीवर अढळ विश्वास ठेवत आलो आहे आणि तरुणांच्या इच्छा, स्वप्ने व अपेक्षांचा मी कायम मनापासून सन्मान केला आहे. ते केवळ भारताचे भविष्यच नाहीत, तर एका नव्या आणि विकसित भारताचे शिल्पकार, निर्माते आणि मार्गदर्शक आहेत. गेल्या १० दिवसांतील घडामोडी पाहून माझे मन अत्यंत दुःखी झाले आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय मुळीच नाही.




