
जिल्ह्यातील कोणत्याही दिव्यांग बांधवावर अन्याय होऊ देणार नाही – जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांची ग्वाही
🔴जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांच्या दालनात दिव्यांग संघटना बरोबर बैठक संपन्न
🔴दिव्यांगाच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन होणार
🔴नवनिर्मिती फाउंडेशन उक्षी रत्नागिरीचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग संघटनेची बैठक संपन्न
रत्नागिरी, प्रतिनिधी : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या, शासकीय योजनांचा लाभ, शिक्षण, रोजगार, आरोग्य, सामाजिक सुरक्षा तसेच स्थानिक पातळीवरील अडचणी याबाबत आज जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांच्या दालनात दिव्यांग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील कोणत्याही दिव्यांग बांधवावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ठाम ग्वाही उपाध्यक्ष विलास चाळके यांनी दिली.
ही बैठक नवनिर्मिती फाउंडेशन उक्षी, रत्नागिरीचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीस राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी आणि चिपळूण येथील दिव्यांग संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी, दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड, शिक्षण, स्वयंरोजगार, आरोग्य सुविधा, निवारा, सहाय्यभूत साहित्य, रोजगाराच्या संधी तसेच स्थानिक प्रशासनाशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांनी सांगितले की, “दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यांच्या अडचणी केवळ ऐकून न घेता त्या मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील कोणत्याही दिव्यांगावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा करून तो सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.”
बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेत लवकरच जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगांच्या प्रश्नांवर विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी तसेच दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून, प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यात येणार आहेत.
नवनिर्मिती फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला. दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटितपणे काम केले जाईल आणि जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग कुटुंबाच्या पाठीशी नवनिर्मिती फाउंडेशन भक्कमपणे उभी राहील, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील समस्या मांडत प्रशासनाने नियमित संवाद ठेवावा, विशेष शिबिरे आयोजित करावीत आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र समन्वय यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी केली.
ही बैठक दिव्यांगांच्या प्रश्नांना न्याय देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली असून, आगामी विशेष बैठकीत अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.




