
शासनाने कर्जमाफीच्या पिकविम्याचे निकष बदलण्याची आंबा बागायतदारांची मागणी
बदलत्या हवामानाचा मोठा फटका कोकणातील हापूस आंबा पिकाला बसला असून, यंदा केवळ २० टक्केच उत्पादन हाती येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, शासनाने ६० कोटींच्या कर्जमाफीसह पीक विम्याचे निकष बदलण्याची मागणी बागायतदारांकडून करण्यात आली आहे. आंबा व्यावसायिक व बागायतदार संघटनेचे पदाधिकारी विवेक भिडे आणि प्रकाश साळवी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कृषि विद्यापीठाच्या अहवालानुसार यंदा आंबा बोगांमध्ये अत्यल्प प्रमाणात फळधारणा झाली असून, केवळ २० टक्केच उत्पादन राहण्याची शक्यता आहे. परिणामी बाजारपेठेत आवक मोठ्या प्रमाणात घट्ली आहे. वाशी बाजारात एरव्ही सुमारे ६ हजार पेट्याची आवक होत असताना सध्या ती केवळ एक हजार पेठ्यांवर आली आहे. त्यामध्ये
रत्नागिरीचा वाटा फक्त ४०० ते ५०० पेट्यांपर्यंत मर्यादित राहिला आहे. त्यामुळे आखाती देशांत होणार्या आंबा निर्यातीवरही मोठा परिणाम’ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उत्पादन घटल्यामुळे आंबा बागायतदारांनी घेतलेले कर्ज फेडणे कठीण झाले आहे. आंबा पिकासाठी घेतलेले कर्ज सुमारे ६० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले, पीकच हाती नसल्याने कर्जफेड अशक्य झाली असून, शासनाने तातडीने मदतीचा हात दैत कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सध्याच्या पीक विमा योजनेत केवळ ५ एकरपर्यंतच्या बागांनाच भरपाई मिळते, हा निकष अन्यायकारक असल्याचा आरोपही बागायतदारांनी केला. बागायतदारांना विश्वासात न घेता विमा योजनेचे निकष ठरवले जात असल्याने अनेकांना त्याचा लाभ मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विमा दाव्यांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसवण्याची योजना आखण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. पावसाच्या अचूक नोंदीमुळे विमा परताव्यासाठी ठोस पुरावे उपलब्ध होतील, असेही सांगण्यात आले.
www.konkantoday.com




