
कोकणाचे कोकणपण आपण सर्वांनी जपलं पाहिजे!शाश्वत कोकण परिषदेच्या कार्यक्रमात अनेक पर्यावरण प्रेमींची उपस्थिती.
कोकणात सगळीकडे अवैध वाळू उत्खनन, जमिनीची दलाली करून आपल्यातलीच काही माणसे आपल्याच मातीशी गद्दारी करून कोकण पण नष्ट करण्याचा घाट घातला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून कोकणात येणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना तिथल्या राखणदारांनी प्रकल्प विरोधकांच्या माध्यमातून रेटून विरोध केला आणि अशा विनाशकारी प्रकल्पांना पळवून लावण्यात यश मिळवले. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी साधेपणाने जगले त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. कोकणातल्या माणसाला साध्या पद्धतीने सुद्धा जीवन जगता येऊ शकते. कोकणी माणसाने कोकणपण जपली पाहिजे असे प्रतिपादन पर्यावरण प्रेमी प्रसाद गावडे यांनी रत्नागिरी मराठा भवन येथे आयोजित कार्यक्रमात केले.
शाश्वत कोकण परिषदेच्या माध्यमातून मी राखणदार या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे रत्नागिरीतील मराठा भवन येथे आयोजन करण्यात आली होते. या कार्यक्रमाला सत्यजीत चव्हाण, ऍड. अश्विनी आगाशे, प्रसाद गावडे, चंद्रकांत जाधव, मंगेश चव्हाण, डॉ. मंगेश शिरधनकर, प्रज्ञा पावसकर, मल्हार इंदुलकर, राजापूरच्या गोवळ येथील प्रतीक्षा कांबळे, राजापूर शिवणे खुर्द येथील काशिनाथ गोर्ले, डॉ. मंगेश सावंत, मच्छीमार नेते खलील वस्ता, ओंकार सावंत, अक्षय सावंत, अविनाश उषा वसंत, रुपाली सावंत, विनीत विचारे, योगेश कांबळे, सचिन चव्हाण, अक्षता धारणे, ऋषी पाळंदे यांच्यासह पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
सत्यजित चव्हाण यांनी आपल्या मनोगतातुन पर्यावरण तज्ञ, अभ्यासक माधव गाडगीळ यांच्यासोबत केलेल्या कार्याचा आढावा सांगितला व त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोकणात कोणत्याही प्रकारचे विनाशकारी प्रकल्प येता कामा नयेत यासाठी आपण सर्व कोकण प्रेमींनी लढा उभारला पाहिजे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. ॲड. अश्विनी आगाशे यांनी स्टर लाईट प्रकल्पाच्या वेळी कसे आंदोलन झाले, बालको कंपनीच्या मूळ जमीन मालकांच्या काय काय मागण्या होत्या अशा सगळ्या आठवणी सांगितल्या. शिवणे खुर्द येथील काशिनाथ गोर्ले यांनी बारसु सोलगाव रिफायनरी प्रकल्पाच्या वेळेस कशा पद्धतीने आंदोलन झाले याबाबत मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमावेळी राखणदार दैनंदिनीचे प्रकाशन व वितरण करण्यात आले आणि पर्यावरण रक्षणासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले.




