
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका; उमेदवारांना दिलासा
ऑफलाईन नामनिर्देशनाचीही सवलत; शनिवार-रविवारीही अर्ज स्वीकारले जाणार
मुंबई : आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसंदर्भात उमेदवारांसाठी मोठी व दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता इच्छूक उमेदवारांना ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशनपत्र भरता येणार आहे. त्याचबरोबर शनिवार आणि रविवारीही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट अध्यक्षपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी केवळ ऑनलाईन अर्ज सादर करण्याचीच सुविधा होती; मात्र विविध राजकीय पक्ष आणि इच्छूक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची मागणी केली होती.
या मागणीचा राज्य निवडणूक आयोगाने सकारात्मक विचार करून ऑफलाईन अर्जाची सवलत मंजूर केली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना दोन्ही पर्याय — ऑनलाईन आणि ऑफलाईन — उपलब्ध असतील.
सुट्टीच्या दिवशीदेखील म्हणजेच शनिवार आणि रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र दाखल करता येणार आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांना मोठा दिलासा मिळाला असून, निवडणूक प्रक्रियेत सुलभता आणि पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




