शेतकरी कुटुंबातील लग्नासाठी आता सवलतीच्या दरात एसटी


शेतकरी कुटुंबांना लग्न समारंभासाठी सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल. तसेच, अवैध प्रवासी करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यात वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या अपघाताच्या अनुषंगाने शिवसेना उबाठा गटाचे सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

सरनाईक म्हणाले, शेतकरी कुटुंब लग्न किंवा अन्य शुभकार्यांसाठी अनेकदा ट्रक, डंपर किंवा अन्य अवैध वाहनांचा वापर करतात. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाकडे नवीन बसचा ताफा दाखल झाल्यानंतर शेतकरी कुटुंबात मुलगा किंवा मुलीचे लग्न असेल व त्यांनी एसटीकडे बसची मागणी केली, तर एसटी महामंडळ त्यांच्या दारापर्यंत बस पोहोचण्यासाठी प्रयत्न करेल.

राज्यात वाढत्या लोकसंख्येमुळे रेल्वे, मेट्रो, एसटी व बेस्ट यांसारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवर ताण वाढला असून, त्याचा फायदा अवैध प्रवासी वाहतूक करणारे घेतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य शासनाने ८,३०० नवीन एसटी बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्या टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होत आहेत. काही मार्गांवर प्रत्येक तासाला आणि पुढील दोन-तीन महिन्यांत दर अर्ध्या तासाने एसटी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button