
आंबा-काजू उत्पादकांना १५ दिवसांत भरपाई, पालकमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे व राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचा पाठपुरावा
पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्य शासनाकडे केलेल्या प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संपूर्ण कोकण विभागासा शेतकर्यांना २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. सामंत यांनी संपूर्ण कोकणच्या निधीसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे ९२ हजार ३४२.७८ हेक्टर क्षेत्राला मदत जाहीर झाली आहे. बागायतदारांना विहित निकषांनुसार जास्तीतजास्त आर्थिक मदत मिळावी, यासाठी त्यांनी थेट मंत्रालय स्तराव सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना इतर सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक निधी मिळाला आहे. जिल्ह्यातील तब्बल ५२ हजार ६२८ शेतकर्यांना या मदतीचा थेट लाभ मिळणार आहे.
अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतकर्याचे आंबा व काजू उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात सरकारने आर्थिक मदत करण्याबाबत शिवसेनेचे आमदार निलेश राणे व राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भरणे म्हणाले की, कोकणातील बागायतदार शेतकर्यांच्या नुकसानीची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेऊन बाधित शेतकर्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या निकषांनुसार, हेक्टरी सुमारे २२ हजार ५०० रुपयांप्रमाणे मदत देण्यात येणार असून, कोकण विभागासाठी २०९ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ही मदत लवकरच वितरित केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com




