
संगमेश्वर तालुक्यातील आंगवली लाखणवाडीत रिक्षा पलटी; बोंड्ये येथील रिक्षाचालकाचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील आंगवली लाखणवाडीतील तीव्र उतारात रिक्षा पलटी होऊन बोंड्ये येथील रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (३० ऑगस्ट) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला. प्रवाशांना आणण्यासाठी जात असताना झालेल्या या अपघातात बोंड्ये येथील विजय काशिराम चव्हाण (वय-५२) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची बातमी समजताच आंगवलीचे माजी सरपंच संतोष अणेराव, पोलीस पाटील सतीश अणेराव, पं. स. सदस्य मंगेश बांडागळे, अनंत जाधव, ललिता गुडेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी विजय चव्हाण यांना देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणी करून मृत घोषीत केले.
दरम्यान, अपघाताची माहिती समजताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. विजय चव्हाण यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच बोंड्येतील ग्रामस्थ व देवरूखातील रिक्षाचालकांनी देवरूख ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.




