
अभिनेत्री त्रिशाविषयी अश्लील विधान CM विजय यांच्या जिव्हारी; पोलिसांनी थेट उदयनिधी स्टॅलिन यांना उचललं…
Tamil Nadu political controversy : तमिळनाडूमध्ये राजकीय घमासान सुरू झाले आहे. डीएमकेचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी स्टॅलिन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, उदयनिधी यांनी तत्पुर्वीच कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केल्याने त्यावर निर्णय होईपर्यंत अटक टळली आहे.
नेमकं काय घडलं?
तंजावूर येथे कावेरी पाणीप्रश्नावर ‘डीएमके’कडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान उदयनिधी यांनी मुख्यमंत्री विजय यांच्यावर सडकून टीका केली. कावेरीच्या पाणी प्रश्नाबाबत मुख्यमंत्री गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांचे भाषण सुरू असतानाच गर्दीतून काही कार्यकर्त्यांनी ‘त्रिशा… त्रिशा…’ अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. त्यावर उदयनिधी यांनी दुहेरी अर्थाचे आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप आहे.
अभिनेत्री त्रिशा आणि मुख्यमंत्री विजय यांच्यातील मैत्रीच्या नात्याविषयी सोशल मीडियामध्ये बरीच चर्चा होते. त्यावरून उदयनिधी यांनी त्रिशा आणि मुख्यमंत्र्यांना उद्देशून विधान केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे विधान सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले. विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केल्यानंतर उदयनिधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची राष्ट्रीय महिला आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे.
पोलिसांनी मंगळवारी सकाळीच कथित अश्लिल व मानहानीकारक विधानाप्रकरणी उदयनिधी यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांचे चेन्नईतील नीलांकराई हे निवासस्थान गाठले. यावेळी डीएमकेच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा जमाव घराबाहेर जमला होता. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यात उदयनिधी यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
दरम्यान, उदयनिधी यांनी गुन्हा दाखल होताच कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आजच सुनावणी होणार आहे. तोपर्यंत पोलिसांनी अटक करू नये, असे आदेश कोर्टाने दिले आहे. त्यामुळे उदयनिधी यांची अटक तात्पुरती टळली आहे. उदयनिधी यांनी आपण काहीही आक्षेपार्ह बोललो नसल्याचे सांगत ही कारवाई राजकीय सूडभावनेने होत असल्याची टीका केली आहे.




