
दरडींच्या धोक्यामुळे आंबेनळी घाट ३१ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद..
अलिबाग : पोलादपूर घाट परिसरात सुरू असलेली अतिवृष्टी तसेच भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेता, पोलादपूर-महाबळेश्वर राज्य महामार्गावरील आंबेनळी घाट रस्ता दि. ७ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत.
पोलादपूर-आंबेनळी-महाबळेश्वर राज्य महामार्ग (SH-१३९) हा अतिसंवेदनशील, भूस्खलनप्रवण आणि दरडी कोसळण्याचा उच्च धोका असलेला मार्ग आहे. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, मुंबई आणि तहसीलदार, पोलादपूर यांच्या अहवालानुसार या मार्गावरील संभाव्य धोका लक्षात घेऊन यापूर्वी दि. ३ जुलै ते ६ जुलै २०२६ या चार दिवसांच्या कालावधीसाठी आंबेनळी घाट रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
दरम्यान, पोलादपूर घाट परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरू असून काही भागांत दरडी कोसळण्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. आंबेनळी घाट हा दरडप्रवण क्षेत्र असल्याने अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन वारंवार रस्त्यावर दरडी येण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मानवी जीविताला धोका निर्माण होऊ नये तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून घाट मार्गावरील वाहतूक बंद ठेवणे आवश्यक असल्याचा अहवाल संबंधित यंत्रणांनी सादर केला आहे.
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, महाड यांनीही रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) मार्ग दि. ७ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याची विनंती जिल्हा प्रशासनाकडे केली होती.
या अहवालांचा आणि सद्यस्थितीचा विचार करून जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत दि. ७ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
नागरिक आणि वाहनचालकांनी या कालावधीत आंबेनळी घाट मार्गाचा वापर करू नये, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे तसेच प्रवासासाठी उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




