
प्रभानवल्ली येथील ‘आदर्श विद्यामंदिर’मध्ये विधी सेवा जनजागृती कार्यक्रम संपन्नकायदेशीर हक्क आणि योजनांवर मान्यवरांचे मार्गदर्शन
रत्नागिरी, दि. 6 ):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि समान किमान कार्यक्रमानुसार, लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथील ‘श्री आदिष्टी देवी शिक्षण प्रसारक मंडळ’ संचलित आदर्श विद्यामंदिर येथे ‘विधी सेवा जनजागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक व्ही. वाय. जाधव प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी आपल्या भाषणात “घर घर में न्याय की जागृती” या अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. नागरिकांना त्यांच्या मूलभूत कर्तव्यांची जाणीव करून देत, कायदेशीर मदतीसाठी नालसा हेल्पलाईन क्रमांक १५१०० आणि नालसा पोर्टलचा प्रभावी वापर कसा करावा, याचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, तसेच ज्यादा सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. व्ही. जोशी आणि सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
प्रभानवल्ली सरपंच विद्या गावखडकर, उपसरपंच देवेंद्र गुरव, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, आदर्श विद्यामंदिरचे कार्याध्यक्ष जितेंद्र ब्रिद, मुख्याध्यापक वैभव चौगुले, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि महिला बचत गटांतील महिला, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६’ आणि ‘मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, २०१२’ (पोक्सो) अंतर्गत बालकांना मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षणाची माहिती देण्यात आली. पीडित आणि वंचित घटकांसाठी योजना: गुन्ह्यातील पीडितांसाठी असणारी नुकसान भरपाई योजना, आदिवासी समुदायाच्या हक्कांसाठीची ‘संवाद योजना २०१५’ आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध सार्वजनिक सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. कोर्टाबाहेर आपापसातील वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी ‘वैकल्पिक वाद निवारण पद्धती’ आणि त्याचे फायदे यावर विशेष चर्चा करण्यात आली.
कायदेविषयक प्रबोधनासोबतच सामाजिक बांधिलकी जपत, कार्यक्रमानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या हस्ते विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कायदेविषयक शंकांचे निरसन झाल्यामुळे उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.




