
खेड शहर पुरानंतर सावरू लागले; बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्य, व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात आलेल्या भीषण पुरानंतर तब्बल २० तासांनी पाणी ओसरले असून शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विध्वंसाचे चित्र समोर आले आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि गोदामांमध्ये चिखल व गाळ साचल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मुख्य बाजारपेठ, निवाचा चौक, गांधी चौक, पान गल्ली तसेच इतर सखल भागांतील दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने माल, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि अन्य वस्तूंचे मोठे नुकसान झाले. अनेक व्यापाऱ्यांचा वर्षानुवर्षे उभा केलेला व्यवसाय एका रात्रीत उद्ध्वस्त झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पूराचे पाणी ओसरल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. टँकरद्वारे रस्ते, दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणांवरील चिखल व गाळ हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून व्यापारी व स्थानिक नागरिकही स्वतःच्या दुकानांची आणि परिसराची साफसफाई करत आहेत.
दरम्यान, नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी व्यापारी, नागरिक आणि विविध संघटनांकडून करण्यात येत आहे.




