
कॉक्रोच जनता पार्टी आता राजकाणात प्रवेश करणार का? CJP चे प्रवक्ते दास, रांका म्हणाले, “भारतात कशाला…”
Cockroach Janta Party Politics : एक महिन्यापेक्षा अधिककाळ नीट पेपरफुटीचा मुद्दा लावून धरत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या मागणीला अखेर यश आले व शनिवारी दुपारी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान पायउतार झाले.
सीजेपीचे ३६ दिवसांचे आंदोलन यशस्वी झाले आणि केंद्र सरकारने त्यांच्या तिन्हा मागण्या मान्य केल्या. मागण्या मान्य झाल्यानंतर लगेचच सीजेपीने आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. या मोठ्या यशा नंतर आता सीजेपी प्रत्यक्ष राजकारणात उतरणार का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. आंदोलन माघारी घेतल्यानंतर सीजेपीच्या प्रवक्त्यांनीच राजकारणातील प्रवेशाबाबत भाष्य केले आहे.
प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आशुतोष रांका काय म्हणाले?
सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत लगेच राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता फेटाळून लावली. ‘सध्या आमचा भर युवकांच्या चळळीला बळ देण्यावर आहे’, असे रांका आणि दास म्हणाले. ‘सध्या माझ्या डोक्यात एकच गोष्ट आहे ती म्हणजे घरी जाऊन झोप घ्यायची, घरच्यांना भेटून थोडा आराम करायचा. गेल्या खूप महिन्यांपासून मी घरापासून दूर आहे आणि मला आराम करायचा आहे. आम्ही खूपच भारावून गेलो आहोत, ही अभिमानाची बाब आहे. सध्या आम्ही खूप आनंदी आहोत. बघुयात पुढे गोष्टी कशा सरकतात’, असे आशुतोष रांका एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले.
सीजेपी राजकारणात उतरणार का?
राजकीय प्रवेशाबाबत विचारले असता रांका यांनी, ‘भारतात कोणत्याही गोष्टी नाही म्हणायचं नाही, असे माझे मत आहे’, असे उत्तर दिले. दरम्यान, सौरव दास यांनी सध्या सीजेपीचे ध्येय राजकारणात प्रवेश करण्याचे नसल्याचे स्पष्ट केले. ‘सध्या आमचे ध्येय ही चळवळ तळागाळापर्यंत घेऊन जाण्यावर आहे. कारण अगोदरच ७५० ते ८०० राजकीय पक्ष अस्तित्वात असून, कोणताच पक्ष युवकांच्या इच्छा पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे चळवळ तळागाळापर्यंत घेऊन जायचंय, कोणताही पक्ष सत्तेत असो त्यांना युवकांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील, त्यांच्यासाठी काम करावं लागेल, हाच आमचा अजेंडा आहे’, असे दास म्हणाले.
आंदोलनानंतर प्रधार पायउतार
नीट पेपरफुटी प्रकरणी सीजेपीने छेडलेल्या आंदोलनाचे लोण देशभर पसरल्यानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान मोदींकडे सोपवलेला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी स्वीकारला आहे. गेल्या दहा दिवसांत घडलेल्या घटनांमुळे मी खूप दु:खी आहे. हा वैयक्तिक प्रतिष्ठेचा नसल्याचे प्रधान यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. राष्ट्रविरोधी शक्तींनी परिस्थिती अधिक चिघळवू नये आणि देशातील एकता कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही प्रधान यांनी म्हटलंय.
तिसरी बैठक
‘तिसऱ्या बैठकीपूर्वीच प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला होता’, असे आशुतोष रांका म्हणाले. बैठक सुरु झाल्यानंतर आम्ही उरलेल्या दोन मागण्या सरकारसमोर ठेवल्या आणि त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अखेर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती देण्यात आली, असे रांका म्हणाले.




