
मान्सूनने पाठ फिरवल्याने उगवलेली भात रोपे करपू लागली.
मृग नक्षत्राचा अर्धा कालावधी संपत आला तरी मान्सूनने पाठ फिरवल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या तुरळक पावसावर विश्वास ठेवून शेतकर्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उगवलेली कोवळी भात रोपे आता जमिनीतील ओलावा संपल्यामुळे सुकण्याच्या मार्गावर असून शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
जून महिन्याचा अर्धा टप्पा पार झाला असतानाही जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. दरवर्षी या काळात शेतांमध्ये चिखल तयार होऊन लावणीची लगबग सुरू असते. यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. कडक ऊन्हामुळे शेतजमिनी कोरड्या पडल्या असून, नांगरणी करताना धुरळा उडत असल्याचे चित्र अनेक भागांत पाहायला मिळत आहे. पाण्याअभावी मशागतीची पुढील कामे आणि लावणीची तयारीही ठप्प झाली आहे.
www.konkantoday.com




