
रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणार्या शीळ धरणात ४० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणार्या शीळ धरणामधील पाण्याची पातळी खालावली असून, शहरावर आता भीषण पाणी टंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. सध्या धरणामध्ये केवळ ४० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात रत्नागिरीकरांना पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा लागणार असून, पालिका प्रशासनाकडून आतापासूनच पाणी बचतीसाठी पावले उचलली जात आहेत.
मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू असतानाच शीळ ’धरणातील पाणी पातळी ११२.२० मीटरवर खाली आली आहे. सध्या धरणामध्ये ०.८२५ दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. शहराला दररोज सुमारे २० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासते. वाढते तापमान, पाण्याचे बाष्पीभवन आणि होणारी गळती या सर्व घटकांचा विचार करता, सद्यस्थितीतील हा साठा पुढील केवळ ४० दिवस शहराची तहान भागवू शकतो. मान्सून वेळेवर दाखल झाला नाही, तर जून महिन्याच्या अखेरीस रत्नागिरी शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि उपलब्ध पाणी जास्तीत जास्त दिवस टिकविण्यासाठी रत्नागिरी नगर पालिकेने आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. धरणातील पाणी दीर्घकाळ चालावे यासाठी शहरात एकदिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा विचार पालिका प्रशासनाकडून सुरू आहे
www.konkantoday.com




