
धामणी ग्रामपंचायतीने सादर केलेल्या जलपर्यटन व जलक्रीडा केंद्राच्या प्रस्तावाला डॉ. विनय नातू यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद
संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील असावी नदीतील गाळ उपशाच्या कामाची पाहाणी सिंधूरत्न योजनेचे उपाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. विनय नातू यांनी केली. यावेळी पुढील वर्षीच्या गाळ उपशासाठी आवश्यक सूचना देतानाच धामणी ग्रामपंचायतीने सादर केलेल्या जलपर्यटन व जलक्रीडा केंद्राच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक पूर्तता करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. नातू यांनी केवळ गाळ उपसा करून विकास मर्यादित ठेऊ नये, तर जलपर्यटन, जलक्रीडा आणि पर्यटनविषयक विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्थानिक रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्याची गरज व्यक्त केली. नदी, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि स्थानिक वैशिष्ट्यांचा प्रभावी वापर केल्यास ग्रामीण पर्यटनाला मोठी संधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



