
राजापूर शहर पाणीपुरवठा योजनेच्या कोंदवली येथील गुरुत्ववाहिनी अंथरण्याच्या कामा संदर्भात अडचणीवर आमदार किरण सामंत यांनी काढला मार्ग…
प्रशासन आणि ठेकेदार यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करा. आमदार किरण सामंत यांचे बैठकीत आदेश
राजापूर : राजापूर शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कोंदवली येथील गुरुत्ववाहिनी अंथरण्याच्या कामामध्ये निर्माण झालेल्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी किरण सामंत यांनी पुढाकार घेत सविस्तर आढावा बैठक घेतली.
या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. गुरुत्ववाहिनी अंथरण्याच्या कामादरम्यान काही ठिकाणी स्थानिक पातळीवर अडथळे निर्माण झाले होते. यामुळे काम रखडले होते आणि नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर आमदार सामंत यांनी स्वतः हस्तक्षेप करत सर्व पक्षांना एकत्र बसवून चर्चा घडवून आणली.
बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी आपल्या अडचणी व शंका स्पष्टपणे मांडल्या. यावर आमदार सामंत यांनी प्रशासन आणि ठेकेदारांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, कोणतेही काम करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेणे अत्यावश्यक आहे. ग्रामस्थांच्या भावना आणि अडचणी लक्षात घेऊनच काम पुढे न्यावे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेला समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. संबंधित अधिकाऱ्यांना कामाची गती वाढवण्याचे आदेश देत कोणत्याही प्रकारचा विलंब सहन केला जाणार नाही, असा इशाराही आमदार सामंत यांनी दिला.
आमदार किरण सामंत यांच्या मध्यस्थीमुळे कोंदवली येथील गुरुत्ववाहिनी अंथरण्याच्या कामातील अडथळे दूर होण्यास मदत झाली असून लवकरच हे काम सुरळीतपणे सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे राजापूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा होऊन नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी देखील आमदार सामंत यांच्या हस्तक्षेपाचे स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रशासनासोबत सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.
यावेळी तहसीलदार विकास गमरे, सभापती नंदनी कदम, उपसभापती अभिजीत गुरव, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, जमीर खलपे, जि. प. सदस्य प्रकाश कुवळेकर, ॲड. यशवंत कावतकर, सर्व नगरसेवक, कोदवली ग्रामस्थ, आदी उपस्थित होते




