भास्कर जाधवांच्या नाराजीच्या स्टेटसवर संजय राऊतांचा प्रत्युत्तरात्मक टोला;*

सुनील मंत्री झाला नाही, मग आम्ही रडलो का?”


मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांच्या सूचक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसने राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. “दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते. दिवा विझल्यावर टाकलेल्या तेलाला अर्थ राहत नाही,” या वाक्यांमुळे त्यांची नाराजी अधोरेखित होत असल्याचे अनेकांचे मत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपदाची संधी न मिळाल्याची खंत त्यांनी यापूर्वीच जाहीरपणे बोलून दाखवली होती.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यावर थेट प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत मत मांडले.
“भास्कर जाधव चांगले वाचक आहेत. त्यामुळे त्यांची भाषा नेहमीच वैभवशाली असते. हे वाक्य सुंदर आहे, पण मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त करणे योग्य नाही. आमच्याही कुटुंबाचा सरकार स्थापनेत मोठा वाटा होता. तरीही सुनील राऊत यांना मंत्रिपद मिळाले नाही, मग आम्ही रडलो का? ही राजकीय प्रक्रिया आहे. मोजक्या जागा असतात. त्यावेळी तीन पक्षांचं सरकार होतं. सर्वांना संधी मिळणं शक्य नव्हतं,” असे राऊत म्हणाले.

राऊतांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावत म्हटले, “आमच्यापेक्षा विद्वान, चाणाक्ष, तडफदार नेते मंत्रिमंडळात गेले, पण आज ते पक्ष सोडून गेले. निर्णय पक्षाने घेतले. आम्ही ते मान्य केले.”

भास्कर जाधव यांना उद्देशून राऊतांनी सल्लाही दिला की, “ते आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. त्यांनी जर काही खंत असेल, तर थेट उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी. बाहेरून स्टेटस किंवा वक्तव्य करून वातावरण निर्मिती करणं योग्य नाही. आम्हाला सुद्धा कधी काही सांगायचं असेल, तर आम्ही स्वतः येऊन बोलतो.”

या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गटातील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button