
मला आणि रवीश कुमार यांना पंतप्रधान मोदींनी मुलाखत द्यावी, संजय राऊत यांचे खुले आव्हान !
:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आणि रवीश कुमारला मुलाखत द्यावी आणि गेल्या 11 वर्षात काय केलं आहे हे सांगावं असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. तसेच भाजप आणि मिंधे हे कॉपी करून, लांड्या लबाड्या करून सत्तेत आले आहेत अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.संजय राऊत म्हणाले पंतप्रधानांनी गेल्या 11वर्षात काय केले आहे? परदेशात फिरत राहिले आणि जनतेला खोटी आश्वासने दिली. जर तुम्ही काही केलं असेल तर गेल्या 11 वर्षात काय केलं ते पत्रकार परिषद घेऊन सांगा. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू, किंवा या देशात जे चार पाच पत्रकार आहेत रवीश कुमार, राजदीप सरदेसाई, संजय सिंह यांना मुलाखत द्या. जनतेच्या मनातले प्रश्न आम्ही विचारू. तुम्हीही मोकळ्या मनाने उत्तरं द्या. किंवा आम्ही रवीश कुमार यांच्याकडे अधिकार देतो की त्यानी पंतप्रधान मोदींची एक मुलाखत घ्यावी. जर चार पाच लोकांना मुलाखत देणार असाल तर मलाही त्यांची मुलाखत घ्यायला आनंद होईल. जो कोणी पंतप्रधान मोदींच्या विरोधात बोलेल, जो कोणी लोकशाहीच्या बाजूने बोलेल त्यांना तुरुगांत टाकलं जातं. या देशाचा जो विरोधी पक्ष आहे, त्यांना नरेंद्र मोदींनी संपवलं आहे हेच त्यांचं गेल्या 11 वर्षातलं यश आहे.
खोटं बोलण्यासाठी कुणाला नोबेल पुरस्कार मिळला असता तर सर्वप्रथम पंतप्रधान मोदींना ते मिळालं असतं असेही संजय राऊत म्हणाले.तसेच मी काय ते निलेश राणे किंवा नितेश राणे यांच्याप्रमाणे तोल सोडून बोलणारा माणूस नाही. मुळात भावाभावात वाद होऊ नयेत. घर कोणाचेही असू द्या. राजकारणामुळे घरामध्ये वाद निर्माण होऊ नये हा वैचारिक वाद असू शकेल. एक भाऊ एका पक्षाचे आमदार आहे दुसरे भाऊ दुसऱ्या पक्षाचे आमदार आहेत. कदाचित वैचारिक वाद असेल आणि त्यांचे वडील आणि त्यांची आई सक्षम आहे वाद सोडवायला. ते एकाच घरात राहतात वेगळे राहत नाहीत. हा राजकीयवाद किंवा वैचारिक वाद असेल तर तो सहज सुटू शकतो. आणि असे वाद ही महाराष्ट्राची एक वैभवशाली परंपरा आहे अशा प्रकारच्या वादातून महाराष्ट्र पुढे गेलेला आहे असेही संजय राऊत म्हणाले.
मिंधे गटाचे मंत्री खोटं बोलत आहेत. हे कॉपी करून पास होणारे लोक आहेत. हे सगळे त्यांचे नेते त्यांचे आमदार देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष. राहुल गांधींचा लेख त्यावरच आहे, हे कसे पास झाले. तुम्ही वारंवार तुम्हाला प्रश्न विचारताय त्या सगळ्या प्रश्नांच उत्तर राहुल गांधींचा लेख आहे. आम्ही आतापर्यंत मांडलेली भूमिका हीच आहे की हे लोक कॉपी करून, चोऱ्या माऱ्या करून लांड्या लबाड्या करूनच पास झाले आहेत आणि सत्तेवर आले आहेत असा घणाघातही संजय राऊत म्हणाले.