
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘सनातन पंथ शास्त्र’ ग्रंथाचे लोकार्पण
देहदान व अवयवदान करणाऱ्या कुटुंबीयांचा कृतज्ञता सन्मान


नाणीज, दि. ३१ : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र नाणीजधामच्या सुंदरगडावर हजारो भाविकांच्या साक्षीने जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘सनातन पंथ शास्त्र’ या ग्रंथाचे भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला. जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तसेच उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

या सोहळ्यास काँग्रेस नेते नानाभाऊ पटोले, औसा (लातूर)चे आमदार अभिमन्यू पवार, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, कोकण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, रत्नागिरी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग, प्रांताधिकारी जीवन देसाई, नाणीजचे सरपंच विनायक शिवगण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या लेखणीतून साकारलेला ‘सनातन पंथ शास्त्र’ हा ग्रंथ सनातन धर्माचे तत्त्वज्ञान, परंपरा, संस्कार आणि शास्त्रोक्त विचार सर्वसामान्यांना सहज समजेल अशा सोप्या, ओघवत्या व अभ्यासपूर्ण भाषेत मांडणारा आहे. ग्रंथाचे लोकार्पण होताच उपस्थित हजारो भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी जगद्गुरु श्रींच्या अध्यात्म, समाजसेवा, पर्यावरण संवर्धन, शिक्षण, आरोग्य आणि मानवकल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे तोंडभरून कौतुक केले. समाजाला विधायक दिशा देणारे त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी मार्गदर्शन करताना जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी म्हणाले, “या संतपीठावर सर्वपक्षीय लोक एकत्र येतात, हीच सनातन धर्माची खरी ताकद आहे.”
या कार्यक्रमात जगद्गुरु श्रींच्या प्रेरणेने सुरू असलेल्या मरणोत्तर देहदान व अवयवदान जनजागृती अभियानात सहभागी झालेल्या कुटुंबीयांचा विशेष कृतज्ञता सन्मान करण्यात आला. आपल्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर देहदानाचा महान निर्णय घेऊन समाजासाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण करणाऱ्या कुटुंबीयांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जगद्गुरु श्रींच्या प्रेरणेने आतापर्यंत २२७ मरणोत्तर देहदान घडून आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ-व्हिडिओ संदेशाद्वारे जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी तसेच देशभरातील सर्व भक्तांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या संदेशात त्यांनी जगद्गुरु श्रींच्या मानवसेवा, समाजजागृती आणि विविध लोककल्याणकारी उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार होते. मात्र तातडीच्या शासकीय कामामुळे त्यांना उपस्थित राहणे शक्य झाले नाही. त्यांनी दूरध्वनीद्वारे जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी तसेच उपस्थित हजारो भाविकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर पार पडलेला ‘सनातन पंथ शास्त्र’ ग्रंथाचा लोकार्पण सोहळा, देहदान व अवयवदान करणाऱ्या कुटुंबीयांचा कृतज्ञता सन्मान आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती यामुळे हा कार्यक्रम भक्तांसाठी प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला, या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.श्रद्धा बोडेकर यांनी केले,




