जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


रत्नागिरी, दि. 17 : जिल्हा युवा पुरस्कार जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहे. इच्छुक युवक, युवती व संस्था यांनी जिल्हा युवा पुरस्कार सन २०२३-२४ व २०२४-२५ करीता नामांकन अर्ज / प्रस्ताव सादर करावे.

जिल्हा युवा पुरस्कारासाठी लाभार्थीनी करावयाचा नमुना अर्ज अ व ब भरून क्रीडा व युवक संचालनालयाचे संकेतस्थळ www.sports.maharashtra.gov.in वर ऑनलाईन सादर करावा.

अर्ज नमुना अ व ब जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी, जिल्हा क्रीडा संकुल रत्नागिरी, प्लॉट नं. os-१५, बाफना मोटर्स जवळ, एम. आय. डी. सी. मिरजोळे, रत्नागिरी येथून घेऊन १५ जुलै २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत सदर नमुना ऑनलाईन सादर केल्याची प्रत जमा करावी. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी कळविले आहे.
पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम दहा हजार हजार रुपये (प्रति युवक व युवतींसाठी), प्रति संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम पन्नास हजार रुपये आहे. पुरस्काराचे मुल्यांकन हे युवा व युवा विकासाचे कार्य करणा-या संस्थांनी केलेले कार्य १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीतील गत तीन वर्षाची केलेली कार्य कामगिरी विचारात घेण्यात येईल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य. राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसुचीत जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग इ. बाबतचे कार्य, शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभुण, व्यसनमुक्ती तसेच युवाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महीला सक्षमीकरण इ. बाबत कार्य, साहस, इ. बाबतचे कार्य. इत्यादी बाबींचा विचार केला जाईल.
जिल्हास्तर युवा पुरस्कार पात्रतेचे निकष (युवक व युवती) पुढील प्रमाणे आहेत. अर्जदार युवक/युवतीचे वय पुरस्कार वर्षातील १ एप्रिल रोजी १३ वर्षे पूर्ण व ३१ मार्चरोजी ३५ वर्षे पर्यंत असावे. जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदाराचे त्या जिल्हयात सलग ५ वर्ष वास्तव्य असावे. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इ.) अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. एका जिल्हयात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्हयात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविदयालयातील प्राध्यापक / कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
जिल्हास्तर युवा पुरस्कार संस्थांसाठी पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत. पुरस्कार संस्थेस विभागून दिला जाणार नाही. संस्थानी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इ.) अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० नुसार पंजीबध्द असावी. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थांचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. एका जिल्हयात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्हयात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अर्जदार / संस्थेच्या सदस्यांचा पोलिस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला (संबंधित परिक्षेत्रातील पोलिस स्टेशन) देणे आवश्यक राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button