
पक्ष फोडण्यासाठी पोलिसांचा टोळीसारखा वापर, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा.
राज्यात सुरुवातीला काँग्रेस दरारा होता. तेव्हा पोलिसांकडून शिवसैनिकांना धमक्या यायच्या की, तू काँग्रेसमध्ये ये नाहीतर तुला टाडा लावतो. आता सुद्धा तेच सुरू आहे.पोलिसांचा वापर हा आपल्या टोळीतल्या लोकांसारखा केला जात असून पक्ष फोडले जात आहेत. जुनी प्रकरणे उकरून काढली जात आहेत. पक्षांना नामोहरम करण्याचे काम केले जात आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली. ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांच्या ‘मी पाहिलेला तीन दशकांतील थरार’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहोळा शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झाला.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.आता मी शिवसेना पक्षप्रमुख असलो तरी लहानपणापासून मी शिवसेनेची वाटचाल पाहत आलो आहे. राजकीय हाणामाऱ्या होत असतात आणि त्या झाल्याच पाहिजेत. पण हाणामारी म्हणजे दंगली नाही, तर मतभेद, मतभिन्नता, आंदोलने असतात. परंतु, जसा काळ बदलतो, तशी गुन्हेगारी बदलत जाते, पोलीस बदलतात. गुन्हेगारांची शस्त्र, त्यांच्या चौकशा बदलतात, त्याप्रमाणे पोलिसांच्याही चौकशा बदलतात. आताची वृत्तपत्र पाहिली तर क्राईम्स ऑफ इंडिया झाली आहेत.
सगळीकडे क्राईमच असते. त्याशिवाय पेपर चालेल की नाही अशी भीती असते. म्हणजे पेपर चालवण्यासाठी गुन्हेगार काम करतात काय? अशी शंका ठाकरेंनी उपस्थित केलीएक गोष्ट आपल्याला मानवीच लागेल की, ज्याला आपण ‘अंडरवर्ल्ड’ म्हणतो, ते वर्ल्ड आहेच. ही वेगळी दुनिया आहे. हे पुस्तक वाचले असता कोणाकोणाचे कसे संबंध आहे, कसे असू शकतात, हे लक्षात येते. त्यामुळे ही कल्पनेच्या पलीकडले आहे. या पुस्तकात छोटा शकील आणि न्यायाधीशांचे संभाषण लिहिले आहे. एखादा गुंड थेट न्यायाधीशांना सांगतो की, ये मेरा काम कर के दो. म्हणजेच त्याला वसुली करायची होती.
असे जर का संबंध असतील तर समाजाने न्याय मागायचा कोणाकडे?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.पोलीस हे एक शस्त्र आहे. त्या शस्त्राचा कोण कसा वापर करतोय, त्याच्यावरती आपला समाज निरोगी राहणार की रोगी होणार हे ठरत असते. पण पोलिसांना मोकळीक दिली तर ते खूप मोठा चमत्कार करू शकतील, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, माजी खासदार कुमार केतकर, खासदार अरविंद सावंत, संजय राऊत उपस्थित होते.