
रत्नागिरी जिल्ह्यात अवघी ८२ हवामान केंद्रे
रत्नागिरी जिल्ह्याचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार पाहता हवामानातील बदल नोंदवण्यासाठी बसवण्यात आलेल्या हवामान यंत्रांची संख्या कमी पडत आहे. प्रत्येक महसूल मंडलनिहाय एक याप्रमाणे अवघी ८२ हवामान केंद्रे असली तरीही प्रत्येक गावाच्या हवामानातील बदल टिपला जात नसल्याची तक्रार बागायतदारांकडून होते. त्यामुळे विमा कवच घेऊनही लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी होतात. यावर उपाययोजना म्हणून जास्तीतजास्त हवामान केंद्र सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात १ हजार ५५१ गावे आहेत. मात्र, त्याठिकाणी सर्वत्र उच्चतम तापमान, निच्चांकी तापमान, अवेळीचा पाऊस, गारपीट, हवामानात होणारे बदल टिपण्यासाठी प्रत्येक महसूल मंडळातील हवामान केंद्रे सक्षम नसल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होते. बदल टिपण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राचा निर्णय घेतला आहे. मात्र, जागेची उपलब्धता करून देण्यासाठी ग्रामपंचायतींसमोर अडसर निर्माण झाला आहे. पारंपरिक पर्जन्यमापकाची अचूकता कमीच आहे. जिल्ह्यात ८२ महसूल मंडले असून, प्रत्येक महसूल मंडलात एक हवामान यंत्र बसवण्यात आले आहे.
www.konkantoday.com




