
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांचा तालुका प्रमुख पदाचा आणि प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आपल्या तालुका प्रमुख पदाचा आणि प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा मंगळवारी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटात एकच खळबळ उडाली असून आपण आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची पहिली प्रतिक्रिया बंड्या साळवी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राजीनाम्यानंतर लवकरच प्रदीप उर्फ बंड्या साळवी हे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे.
त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे, मी रत्नागिरी तालुकाप्रमुख पदावर 2007 पासून संघटनेचे प्रामाणिकपणे काम करत आहे. परंतु आता मी माझ्या वैयक्तिक कारणातून रत्नागिरी तालुकाप्रमुख पदाचा व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हंटले आहे. त्यांच्या या राजीनाम्याने अनेकांनी अंदाज बांधले आहे. गेल्या काही दिवसांपासून बंड्या साळवी यांच्या शिवसेना गट बदलाच्या शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या राजीनाम्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. दोनच दिवसापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत मोठा राजकीय भूकंप करणार असे म्हटले होते.