
सव्वा वर्षात वाहतुकीचे नियम मोडणार्यांकडून 6 कोटी 13 लाख दंड वसूल
रत्नागिरी : जिल्ह्यात मागील सव्वा वर्षात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणार्या 1 लाख 94 हजार 24 वाहन चालकांना तब्बल 6 कोटी 13 लाख 19 हजार 150 रुपयांचा दंड करण्यात आला आहे. यामध्ये विना हेल्मेट वाहन चालकांची संख्या सर्वाधिक आहे.
या पूर्वी वाहन चालकांना थांबवून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात होता. मात्र वर्षभरापूर्वी ऑनलाईन चलन पद्धत आल्याने वाहन चालकांशी वाद न घालता केवळ वाहनाचा फोटो मारून कारवाई करणे वाहतूक पोलिसांना शक्य झाले आहे. हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांना 1 कोटी 74 लाख 78 हजार दंड, चारचाकी वाहनात सीटबेल्ट न वापरणार्या वाहन चालकांना 26 लाख 75 हजारांचा दंड; दुचाकी, चारचाकी चालवताना मोबाईलचा वापर करणार्या वाहन चालकांना 2 लाख 24 हजारांचा दंड, इन्शुरन्स नसताना वाहन चालविणे 10 लाख 8 हजार 800 रु. दंड, परवाना नसताना वाहन चालविणे 27 लाख 55 हजार रु.दंड, फॅन्सी नंबर प्लेट लावणार्या वाहन चालकांना 17 लाख 27 हजार रु.दंड व इतर नो पार्किंग, दुचाकीवर ट्रिपल सीट, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, अति भरधाव वेग अशा एकूण 1 लाख 94 हजार 24 वाहनचालकांना दंड करण्यात आला आहे.