रत्नागिरीच्या समृद्धीला द्या तुमची कलात्मक ओळख‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ साठी भव्य लोगो स्पर्धा; विजेत्याला मिळणार १० हजारचे बक्षीस


*रत्नागिरी, दि. १९ – अथांग अरबी समुद्र, सह्याद्रीची निसर्गसंपदा, जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि समृद्ध कोकणी संस्कृतीचा वारसा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ सज्ज झाली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेची वेगळी व प्रभावी ओळख अधोरेखित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तरीय लोगो (बोधचिन्ह) निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. आपली कल्पकता दाखवून जिल्ह्याच्या विकासाचे मानचिन्ह साकारणाऱ्या विजेत्यास १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल. जिल्ह्यातील कल्पक नागरिक, विद्यार्थी, तरुण कलाकार आणि व्यावसायिक ग्राफिक डिझायनर्सनी या महास्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
तुमच्या कल्पक डिझाइनमध्ये रत्नागिरीची खरी ओळख उमटायला हवी:

  • सागरी वैभव: निळाशार समुद्र, समृद्ध मत्स्यव्यवसाय व बंदरे.
  • निसर्ग व कृषी: सह्याद्रीची हिरवाई, पर्यटन आणि जगप्रसिद्ध हापूस.
  • प्रगतीची नवी दिशा: कोकणी संस्कृती, रोजगारनिर्मिती, आधुनिक उद्योजकता आणि शाश्वत विकास.
    डिझाइन व तांत्रिक निकष
  • स्वरूप: लोगो JPG किंवा PNG फॉरमॅटमध्ये पाठवावा (शक्य असल्यास AI, CorelDRAW, PDF, EPS किंवा Vector फाईल जोडावी).
  • संकल्पना नोट: लोगोचा अर्थ व त्यामागील विचार स्पष्ट करणारे १०० ते १५० शब्दांचे टिपण जोडणे अनिवार्य आहे.
  • उपयोगिता: लोगो डिजिटल मीडियापासून ते शासकीय फलक, लेटरहेड व पुस्तकांपर्यंत सर्व आकारांत सुस्पष्ट व प्रभावी दिसणारा असावा.
  • मूल्यांकन: मौलिकता, आकर्षक रंगसंगती, साधेपणा आणि योजनेच्या उद्दिष्टांशी सुसंगतता या निकषांवर १०० गुणांमधून परीक्षण होईल.
    महत्त्वाचे नियम
  • डिझाइन पूर्णपणे स्वतःचे व मूळ (Original) असावे; कोणत्याही प्रकारची नक्कल आढळल्यास प्रवेशिका बाद ठरेल.
  • कोणत्याही राजकीय, धार्मिक, जातीय भावना दुखावणारे घटक अथवा अधिकृत शासकीय राजमुद्रा वापरण्यास सक्त मनाई आहे.
  • निवडलेल्या बोधचिन्हाचे सर्व कॉपीराइट्स व हक्क ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती’कडे राखीव राहतील.
    स्पर्धेत कसे सहभागी व्हाल?
  • अंतिम मुदत: ३१ ऑगस्ट, सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • ई-मेल पत्ता: dporatnagiri@gmail.com
  • प्रत्यक्ष अर्ज: जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी.
    चला, आपल्या कल्पकतेने रत्नागिरीच्या नव्या विकासपर्वाला अधिकृत रूप देऊया!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button