भाजपचा अहंकार, मस्तवालपणा प. बंगालच्या जनतेनं उतरवला – आ.भास्करराव जाधव

आज पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. प्रथमतः या पाचही राज्यांतील सर्व विजयी उमेदवारांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या विजयाकरिता परिश्रम घेतलेल्या त्या त्या पक्षांच्या नेत्यांचे व लाखो कार्यकर्त्यांचेदेखील मी अभिनंदन करतो.अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदार भास्करराव जाधव यांनी दिली आहे
विशेष करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी यांचं मी खास अभिनंदन करतो. त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या विजयाने या देशामध्ये लोकशाही प्रगल्भ, भक्कम आणि सशक्त आहे व होत जाईल हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री श्री. अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डा यांच्यासह विविध राज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांनी प. बंगालची निवडणूक जिंकण्याकरीता सर्व विधिनिषेध, कायदे-नियम धाब्यावर बसवून, सत्तेचा अमर्याद वापर करून, निवडणूक आयोगालादेखील आपल्याला जसं पाहिजे तसं वाकवून सत्ता व संपत्ती यांचा वारेमाप वापर करून निवडणूक जिंकण्याच्या वल्गना केल्या. अगदी, ‘अब की बार २०० पार’ अशीही घोषणा दिली. या देशाची परंपरा आणि संस्कृती महिलांचा आदर करण्याची आहे. तीदेखील विसरून श्रीमती ममता बॅनर्जी यांच्यावर शाब्दिक राजकीय, अर्वाच्च, अश्लाघ्य असे हल्ले केले. हे कमी होतं की काय म्हणून त्यांच्यावर शारीरिक हल्ला करून त्यांना जखमीदेखील केलं. परंतु, या जखमी वाघिणीने असा एकच पंजा मारला आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा आणि पक्षाचा चेहरा पार विद्रुप करून टाकला आहे. भाजप नेत्यांचा अहंकार, सत्तेचा उन्माद, मस्तवालपणा, संसदीय लोकशाहीची विटंबना व अधिकारांचा अमर्याद केला गेलेला गैरवापर या सर्वांना आज बंगालच्या जनतेनं लोकशाही मार्गाने उत्तर दिलं आहे. मी बंगालच्या जनतेला लाख लाख धन्यवाद देतो व एका महिलेची होणारी बेअब्रू, विटंबना तुम्ही कृष्णाच्या रूपाने सावरून घेतली व त्यांना विजयी केलंत, त्याबद्दल मी तुमच्यापुढे नतमस्तक होतो आणि ममता दिदींना मनापासून सलाम करतो.
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना माझी नम्र विनंती आहे. आधीच आर्थिक, सामाजिक, देशाची सुरक्षा, जनतेचं आरोग्य अशा सगळ्याच आघाडीवर केंद्र सरकार अपयश ठरले आहे. त्यात कोरोनाच्या महामारीमुळे हजारो लोक आज तडफडून मरत आहेत. एखादं राज्य जिंकलं असता किंवा हरला असता काय, याचा विचार न करता या देशातल्या नाहक मारणाऱ्या जनतेला वाचवलं असतंत तर या जनतेने तुम्हाला लाख लाख धन्यवाद दिले असते. आता निवडणुका झाल्या आहेत. आता तरी कृपया या महामारीतून लोकांना वाचवण्यासाठी लक्ष द्या, हीच हात जोडून विनंती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button