शिक्षक दिनी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जुनी पेन्शन मिळावी यासाठी मुक मोर्चा काढला.


1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आज मराठा भवन, माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे मुक मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी महोदय यांचेमार्फत मा. मुख्यमंत्री महोदय व मा. शिक्षण मंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात राज्यातील सुमारे 26000 पीडित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे 2005 पूर्वी नियुक्त आहेत व नैसर्गिक न्यायाने ते पेन्शनसाठी पात्र आहेत हे निदर्शनास आणून दिले. सदर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी, सेवाजेष्ठता यासाठी नियुक्त दिनांकाचा विचार केला जातो. या तत्वानुसार पेन्शन साठीही नियुक्ती दिनांक ग्राह्य धरावा ही मागणी करण्यात आली. सदर कर्मचारी यांनी सुरुवातीला नियुक्ती वेळी 8 ते 10 वर्षे विनवेतन काम केले आहे. तसेच यातील सुमारे 8000 कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांना गेले 10 ते 12 वर्षे कोणत्याही प्रकारचे सेवानिवृत्ती वेतन मिळत नसल्याने त्यांची हालअपेष्टा होत आहे. सदर सेवानिवृत्त कर्मचारी यांनी सरकार सेवानिवृत्ती वेतन देऊ शकत नसल्यास इच्छा मरणाची मागणी केली आहे. आज हे सेवानिवृत्त कर्मचारी उदर निर्वाह करण्यासाठी भाजी विकणे, इमारतीवर गवंड्याची कामे करणे, हॉटेल मध्ये काम करणे यासारखी कामे करत आहेत हे सरकारसाठी भूषणावाह नाही असे सेवानिवृत्त कर्मचारी यांनी मत मांडले. या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला 25 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदत दिली असून सदर मुदतीत मागण्या मान्य न झाल्यास 28 सप्टेंबर 2026 पासून लाक्षणिक उपोषण व 2 ऑक्टोबर 2026 पासून आमरण उपोषण करण्याचा ईशारा देण्यात आला आहे. वास्तविक मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, संभाजीनगर खंडपीठ, कोल्हापूर सर्किट बेंच यांनी या कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन देण्यात यावी असे सकारात्मक आदेश देऊनही सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. सदर मुक मोर्चा यशस्वी करण्यासाठी राज्य समन्वयक संदेश राऊत, राज्य प्रतिनिधी रामचंद्र केळकर, रत्नागिरी जिल्हा जुनी पेन्शन संघटना उपाध्यक्ष रुस्तुम मुल्ला,रविंद्र सुर्वे,रत्नागिरी जिल्हा सचिव संदेश रहाटे, जिल्हा सहसचिव महेंद्र पवार, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघटना सचिव महेश पाटकर, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी श्रीशैल्य पुजारी, रत्नागिरी तालुका अध्यक्ष प्रदीप पवार,राजापूर तालुका अध्यक्ष पी. एम. पाटील सर, मा सुभाष सोकासने,म्हस्के सर, यांनी मार्गदर्शन केले. या मुकमोर्चा साठी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button