
मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी उड्डाणपुलावरू एकेरी वाहतूक सुरू
मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथील उड्डाणपुलावरून अखेर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या वाहनचालकांना गणेशोत्सवाच्या तोंडावर यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक उड्डाणपुलावरून सुरू करण्यात आली असून, संगमेश्वरकडून रत्नागिरीच्या दिशेने येणारी वाहतूक मात्र सध्या उड्डाणपुलावरून बंद ठेवण्यात आली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढत असतानाच निवळी उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू झाल्याने या भागातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या दिशेने जाणार्या वाहनांना आता उड्डाणपुलाचा वापर करता येणार असल्याने प्रवासाचा वेळही कमी होण्याची अपेक्षा आहे.




