
कौशल्य आत्मसात करा, अन्यथा विकासाच्या संधी बाहेरचे तरुण घेतील : मंदार फणसे
कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा दिमाखदार समारोप
रत्नागिरी : नवीन विमानतळ आणि बंदरासारख्या मोठ्या विकास प्रकल्पांमुळे कोकणात रोजगाराच्या आणि विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. मात्र, या संधींचा लाभ स्थानिक तरुणांना घ्यायचा असेल, तर त्यांनी काळाची पावले ओळखून आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. अन्यथा कौशल्याच्या अभावामुळे बाहेरून येणारे कुशल तरुण या संधी घेतील आणि स्थानिक तरुण मागे पडतील, असा इशारा न्यूज 18 चे मुख्य संपादक मंदार फणसे यांनी दिला.
नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. विजेत्या विद्यार्थ्यांना फणसे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
यावेळी मंदार फणसे यांनी वक्तृत्व स्पर्धेचे तसेच नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे विशेष कौतुक केले. आज वक्तृत्व कलेच्या माध्यमातून करिअरला गवसणी घालता येते. विद्यार्थ्यांनी केलेले प्रभावी सादरीकरण पाहून आपण भारावून गेलो आहोत,असे ते म्हणाले.
तंत्रज्ञानातील बदलांशी जुळवून घेण्याचे आवाहन
तंत्रज्ञान क्षेत्रातील झपाट्याने होणाऱ्या बदलांकडे लक्ष वेधताना फणसे म्हणाले, तंत्रज्ञान दररोज बदलत आहे. या स्पर्धेच्या युगात स्वतःला टिकवून ठेवायचे असेल, तर तरुणांनी काळाची पावले ओळखून नवनवीन तंत्रज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. नवीन विमानतळ आणि बंदरामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींचा स्थानिक तरुणांनी लाभ घ्यावा, यासाठी कौशल्यविकासावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
सखोल वाचनातून प्रभावी
वक्तृत्व घडते : हुस्न बानू खलीपे
दरम्यान, सकाळी स्पर्धेचे उद्घाटन राजापूरच्या नगराध्यक्षा हुस्न बानू खलीपे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या जीवनप्रवासातील वक्तृत्वाची भूमिका उलगडून सांगितली. माजी आमदार कुसुमताई अभ्यंकर यांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात कसे दिशादर्शक ठरले, याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
सखोल वाचनातून चांगले वक्तृत्व घडते. धाडसाने आपले विचार मांडणे ही आजच्या काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःप्रति आणि आपल्या कामाप्रति निष्ठा ठेवून आत्मविश्वासाने वाटचाल करावी,असे आवाहन खलीपे यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
बक्षीस वितरण समारंभाला नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालक डॉ. अलिमिया परकार, संचालिका सीमा हेगशेट्ये, संचालिका ऋतुजा हेगशेट्ये, प्राचार्य संजय गवाळे, आर्किटेक्ट संतोष तावडे, ‘फणसकिंग’ मिथलेश देसाई, स्पर्धा संयोजक सचिन टेकाळे, परीक्षक डॉ. केदार काळवणे, डॉ. सदानंद आग्रे, संदीप कांबळे, ईश्वरचंद्र हलगरे, बाणे, चैतन्य कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.




