
बालकांच्या हक्कांचे संरक्षण व न्यायासाठी सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने काम करावे : प्रमुख जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव विधी सेवा सदन येथे विशेष पोलीस पथक, बालकल्याण अधिकारी व विधीज्ञांसाठी कार्यशाळा
रत्नागिरी, दि. २९ ) – बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये काम करणाऱ्या विविध यंत्रणांमध्ये अधिक संवेदनशीलता, समन्वय आणि कार्यपद्धती निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विधी सेवा सदनात मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बालकांच्या हक्कांचे रक्षण आणि त्यांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने व संवेदनशीलतेने कार्य करण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
या कार्यशाळेत बाल न्याय मंडळाच्या प्रधान न्याय दंडाधिकारी तथा सहदिवाणी न्यायाधीश (क स्तर) ए. डी. गाडे यांनी बालकांशी संबंधित प्रकरणांमधील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पोलीस उपअधीक्षक मुख्तार शेख यांनी बालकांच्या संरक्षणाबाबत व त्यासंबंधीच्या कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकला, तर बालकल्याण समितीच्या सदस्य प्रिया लोवलेकर यांनी बालकांशी संबंधित विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर, बालकल्याण समितीच्या सदस्य विनया एस. घाग, शासकीय लोहमार्ग पोलीस अधिकारी संगिता लोंढे, बालकल्याण पोलीस अधिकारी, विशेष पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचारी तसेच विधी क्षेत्रातील पॅनलवरील विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




