
हिंदुंचे पैसे लुटता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, आम्हाला भाजपमुक्त राम हवाय-उद्धव ठाकरे
अयोध्येच्या राम मंदिरात चोरी झाली आहे. या प्रकणी आता शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोनच दिवसांपूर्वी या सर्व पार्श्वभूमीव शिवसेना ठाकरे गटाची पत्रकार परिषद पार पडली होती.या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी ‘रामरक्षा’ आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलनाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये दादरच्या हनुमान मंदिरात शिवसेना ठाकरे गटाकडून रामरक्षा महाआरती करण्यात आली. यावेळी खासदार संजय राऊत यांची देखील उपस्थिती होती.
दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अयोध्यमध्ये झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राम मंदिरासाठी कारसेवकांनी रक्त सांडलं आहे, आम्ही भोळे, भावडे हिंदू आहोत, पण मूर्ख नाही. कुणी मंदिर लुटत असेल तर हिंदू कधीही माफ करणार नाही, असं हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच राम मंदिराला केलेलं सगळं दान कुठे गेलं असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.हिंदुंचे पैसे लुटता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्हाला भाजपमुक्त राम हवाय. त्यामुळे आता राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावर उतरा. शिवसेनेने राम मंदिराला दिलेली चांदीची वीट कुठे गेली? राम रक्षा आंदोलन म्हणजे भर पावसाच पेटलेली ठिणगी आहे. शिवसेना संपवण्याचा अफजलखानी विडा त्यांनी उचलाय. त्यामुळे या आंदोलनासाठी सर्वांनी आता एकत्र या, जोपर्यंत या चोरीचा निष्पक्षपातीपणाने निकाल लागला जात नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. अशी मोठी घोषणा देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे, त्यामुळे आता भविष्यात हे आंदोलन अधिक तापण्याची शक्यता आहे. दरम्यान आता जी जागा आली आहे, ती जाग तशीच ठेवा, झोपू नका, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. भर पावसामध्ये हे आंदोलन आज मुंबईमध्ये पार पडलं आहे. या आंदोलनाला ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.




